डेव्हिस चषक लढत – प्रज्नेशचा परतीच्या एकेरीत विजय
वृत्तसंस्था/ ईस्पू, फिनलँड
डेव्हिस चषक विश्व गट एक लढतीत भारताला फिनलँडकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाच्या दुहेरीच्या लढतीत भारतीय जोडी पराभूत झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला होता. त्यानंतर प्रज्नेश गुणेश्वरनने बिनमहत्त्वाच्या चौथ्या सामन्यात विजय मिळविला.
पहिले दोन एकेरीचे सामने जिंकत फिनलँडने भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुहेरीची लढत जिंकून भारताचे आव्हान जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीय जोडीवर होती. बहिस्थ कर्णधार रोहित राजपाल यांनी दुहेरीत बोपण्णासमवेत दिविज शरणऐवजी रामकुमार रामनाथनला खेळविण्याचा निर्णय घेतला. पण याचा भारताला काहीच फायदा झाला नाही. हेन्री कोन्टिनेन व हॅरी हेलिओव्हारा यांच्याकडून बोपण्णा-रामकुमार यांना दोन सेट्समध्येच पराभव स्वीकारावा लागला. दोघांनी या सामन्यात चांगला संघर्ष करीत दोन्ही सेट्स टायब्रेकरपर्यंत लांबवले. पण ते विजय मिळवू शकले नाहीत.
नंतर झालेल्या परतीच्या एकेरीत प्रज्नेशने पॅट्रिक निकलास साल्मिनेनवर 6-3, 7-5 अशी मात केली. लढतीचा निकाल निश्चित झाला असल्याने एकेरीतील परतीचा दुसरा सामना खेळविण्यात आला नाही. आता वर्ल्ड गुप एक मधील स्थान राखण्यासाठी भारताला पुढील वर्षी प्लेऑफमध्ये खेळावे लागणार आहे.
दुहेरीतील पराभवाबद्दल बोलताना बोपण्णा म्हणाला की, ‘फिनलँडचे खेळाडू बऱयाच काळापासून वरच्या स्तरावर एकत्र खेळत आहेत, हाच मुख्य फरक होता. मी व रामकुमार या स्तरावर प्रथमच एकत्र खेळत होतो. चुरशीच्या गुणांवेळी अनुभवातील हा फरक प्रामुख्याने निर्णायक ठरला. पहिल्यांदाच एकत्र खेळत असलो तरी या सामन्यात आम्ही झुंजार लढत दिली,’ असे तो म्हणाला. जोडीदार बदलण्याचा कर्णधाराचा निर्णयही योग्यच असल्याचे त्याने म्हटले. मात्र डेव्हिस चषकात विजय मिळवायचा असल्यास एकेरीतील कामगिरी सुधारण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. एकेरीचे चार गुण असल्याने आम्हाला त्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. गेल्या सहा वर्षात एकेरीत वरचे मानांकन असलेल्या एकाही खेळाडूला भारतीय खेळाडू हरवू शकलेले नाहीत. यासाठी कनिष्ठ स्तरापासूनच सिस्टीम बदल करून प्रयत्न करावे लागतील आणि यासाठी सरकार व फेडरेशन यांना एकत्र यावे लागेल, असे तो म्हणाला.