प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकरी विरोधी तीन शेती कायदे रद्द करावेत, वीज विधेयक मागे घ्यावे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के इतक्या रकमेचा हमीभाव देणारा केंद्रीय कायदा करावा या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकऱयांचा सत्याग्रहाला दहा महिने पूर्ण होतात यानिमित्ताने केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलानात शेतकऱयांनी सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.
ते म्हणाले, आंदोलक शेतकऱयांना भाजपने हिणवले, देशद्रोही ठरवले. त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला. रस्त्यात खिळे ठोकले. 26 जानेवारी 2020 रोजी सत्ताधारी भाजपने गुंडांना हाताशी धरून ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलन थांबले नाही. 26 सप्टेंबर रोजी आंदोलनाला दहा महिने पूर्ण होत आहेत. गेल्या दहा महिन्यात सहाशेहून अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमांवर शहीद झाले आहेत. त्यात कर्नालच्या सत्याग्रहावरील लाठीमारात एक शेतकरी शहीद झाला. इतके होऊनही शेतकऱयांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. हे आंदोलन दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापक होत आहे. याला पाठिंबा देण्यासाठी सोमवार 27 रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. जुलमी राजवटीला अद्दल घडवण्यासाठी हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन संपतबापू पवार पाटील यांनी केले आहे.