ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील 12 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. दिल्लीसह पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंडमध्ये हा बंद पाळण्यात येत आहे. या बंदला सकाळी पहाटे पासूनच सुरुवात झाली आहे.
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई-अहमदाबाद (नवजीवन) एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे.
भुवनेश्वरमध्येही डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी ट्रेन्स रोखल्या आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मुंबई, नवी मुंबईतील सर्व वाहतूक संघटना पनवेल ते मरिन ड्राहव्हपर्यंत बाइक रॅली काढणार आहे. सकाळी 10 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 10 वाजल्यापासून राळेगणसिद्धीमध्ये लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत.