पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – ईशान्येतील राज्यांना होणार लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत-बांगलादेश यांच्यादरम्यान निर्मित मैत्री सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी अप्रत्यक्ष स्वरुपात पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य केले आहे. डबल इंजिन्सचे सरकार नसलेल्या राज्यांमधील स्थिती सर्वांनाच माहित आहे. त्रिपुराच्या शेजारच्या राज्यात (पश्चिम बंगाल) गरीब, शेतकरी, मुलींना सशक्त करणाऱया योजना लागू करण्यात आलेल्या नाहीत. दुहेरी इंजिन सरकारचा सर्वात मोठा प्रभाव गरिबांना पक्की घरे देण्यात दिसून येत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
त्रिपुरातील जुन्या डाव्या सरकारची 30 वर्षे आणि दुहेरी इंजिनाच्या 3 वर्षांच्या सरकारच्या काळात झालेले बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. पूर्वी कमिशन आणि भ्रष्टाचारापूर्वी कामे व्हायची नाहीत, तर आज सरकारी लाभ लोकांच्या बँक खात्यात थेट पोहोचत असल्याचे मोदी म्हणाले.
उद्योग, नव्या गुंतवणुकीचे ठिकाण
संप संस्कृतीमुळे त्रिपुराला मागे ढकलण्यात आले होते. तर हेच राज्य आता व्यवसाय सुलभतेसाठी काम करत आहे. उद्योगांना टाळे ठोकण्याची वेळ आलेल्या राज्यात आता नवे उद्योग, नव्या गुंतवणुकीचे प्रस्ताव येत आहेत. राज्याच्या कर्मचाऱयांना डाव्यांच्या शासनकाळात वेळेत वेतन मिळत नव्हते. अशा कर्मचाऱयांना आता 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत वेतन मिळत आहे. त्रिपुरातील संपर्कव्यवस्थेत मागील 3 वर्षांमध्ये वेगाने विकास झाल्याचा दावा मोदींनी केला आहे.
ईशान्येसाठी जलमार्गांवर काम
बांगलादेश दौऱयादरम्यान मी आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी मिळून त्रिपुराला बांगलादेशशी थेट जोडणाऱया पुलाच्या कामाचा शुभारंभ केला होता आणि आज याचे लोकार्पण करण्यात आले आहे. मैत्री सेतूसह अन्य सुविधा निर्माण होताच ईशान्य भारताला कुठल्याही पुरवठय़ासाठी केवळ रस्तेमार्गावर अवलंबून राहण्याची गरज नसेल. जलमार्गाद्वारे पर्याय मिळावा याकरता प्रयत्न केले जात असल्याचे मोदी म्हणाले.
ब्रू शरणार्थींचा उल्लेख
त्रिपुराच्या ब्रू शरणार्थींच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक दशकांनी आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळेच तोडगा निघाला आहे. हजारो ब्रू सहकाऱयांच्या विकासाकरता देण्यात आलेल्या 600 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजमुळे त्यांच्या जीवनात अत्यंत सकारात्मक परिवर्तन घडून येणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
बंदरांशी संपर्कव्यवस्था
फेनी ब्रिज खुला झाल्याने अगरतळा हे आंतरराष्ट्रीय सागरी बंदरापासून भारताचे सर्वात जवळचे शहर ठरणार आहे. एनएच-08 आणि एनएच-208 या महामार्गांच्या रुंदीकरणाशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण केले असून यातून ईशान्येशी बंदराशी असलेली संपर्कव्यवस्था अधिकच बळकट होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
फेनी नदीवरील सेतू
हा सेतू भारत आणि बांगलादेशदरम्यान फेनी नदीवर उभारण्यात आला आहे. या सेतूमुळे त्रिपुराच्या दक्षिण हिस्स्यातून बांगलादेशच्या चितगावपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. तसेच या सेतूमुळे माल आणि प्रवासी वाहतुकीला चालना मिळणार आहे. या सेतूमुळे ईशान्येतील उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळेल. फेनी नदी त्रिपुरा आणि बांगलादेशमध्ये वाहते. या सेतूची लांबी 1.9 किलोमीटर असून हा दक्षिण त्रिपुराच्या सबरुम भागाला बांगलादेशच्या रामगढशी जोडतो.