28 हजार 500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूवर लवकरच प्रभावी लस येणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात असतानाच भारत बायोटेकने विकसित पेलेली लस तिसऱया टप्प्यात पोहोचल्याची शुभवार्ता कंपनीने दिली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॅक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे. या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीला लवकरच सुरुवात होणार असून ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अनुमतीही दिली आहे.
भारत बायोटेकने 2 ऑक्टोबरला तिसऱया टप्प्याच्या चाचणीसाठी ‘डीसीजीआय’कडे परवानगी मागितली होती. ही परवानगी आता मिळाली असून स्वदेशी लस लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात भारत बायोटेक तसेच झायडस कॅडिला या कंपनीकडूनही लस विकसित करण्यात येत आहे. या कंपनीची लस चाचणीच्या दुसऱया टप्प्यात आहे. पुणेस्थित सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडूनही लसीवर काम सुरू आहे.
भारत बायोटेक कंपनीने वैद्यकीय चाचण्यांसदर्भात नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार तिसऱया टप्प्यातील चाचणी 18 तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाऱया स्वयंसेवकांवर करण्यात येईल. तिसऱया टप्प्यात एकूण 28 हजार 500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. देशात एकूण दहा ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीची चाचणी होणार आहे. कोव्हॅक्सीन लस निर्माण करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीला ‘आयसीएमआर’चेही सहकार्य आहे. भारत बायोटेकने आपली लस अत्यंत प्रभावी असून कोरोना विषाणूविरोधात लढण्यास सक्षम असल्याचा दावा केला होता. प्राण्यांवर चाचणी केल्यानंतर त्यांच्यात चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.