लंडन / वृत्तसंस्था
मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याकडे भारताच्या स्वाधीन करण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांच्यात लंडनमध्ये बैठक झाली. या बैठकीत विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण लवकरात लवकर करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. मल्ल्याला ब्रिटनहून भारतात आणण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. आता अंतिम टप्प्यात हर्षवर्धन श्रृंगला हे ब्रिटनच्या अनेक मंत्री आणि अधिकाऱयांशी चर्चा करीत आहेत. फरार मल्ल्याला भारतात आणणे आणि त्याला न्यायालयात नेणे यासारख्या अनेक बाबींमध्ये त्यांनी दक्षिण आशियातील संबंधितांशी चर्चा सुरू ठेवलेली आहे.
विजय मल्ल्यावर भारतीय बँकांकडून 9,000 कोटी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँडरिंगचा आरोप आहे. मार्च 2016 मध्ये तो लंडनमध्ये पळून गेला होता. मल्ल्याला प्रत्यार्पण वॉरंटवरून एप्रिल 2017 मध्ये लंडनमध्ये अटक करण्यात आली होती, परंतु जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मल्ल्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेसह 13 बँकांचे कर्ज आहे.
नीरव मोदी यांचा पीएनबी घोटाळा हा देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा आहे. त्याचा मुख्य आरोपी नीरव मोदी आहे. पीएनबी घोटाळय़ाचा आरोपी नीरव लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात आहे.