प्रतिनिधी/ पणजी
म्हादई प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी ‘भारत माता की जय’ संघटनेच्या पुढाकाराने म्हादईमाता पूजन अभियान एकूण 300 गावांतून राबवण्यात येणार असून त्याची सुरुवात 2 फेब्रुवारीपासून होणार आहे, अशी माहिती प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.
म्हादईचे पाणी यापूर्वीच वळवण्यात आले असून एक थेंबही वळवू देणार नाही या सरकारच्या घोषणा पोकळ व खोटय़ा आहेत. सरकार या प्रश्नी सारवासारव करीत आहे. म्हादई प्रश्नावर आगामी विधानसभा निवडणूक रंगणार असून या सरकारचे विसर्जन त्या म्हादईतच होणार असल्याचे भाकित वेलिंकर यांनी प्रकट केले.
नार्वे येथून सुरु होणार अभियान
त्यांनी सांगितले की, म्हादईच्या गोव्यातील 9 उपनद्यांचे पाणी एकत्र करून त्या कलशाच्या पुजनाने अभियानाचा प्रारंभ नार्वे येथील साप्तकोटेश्वर मंदिरात सुरु होणार आहे. संपूर्ण गोवा राज्यातून 108 दाम्पत्ये या पुजनात सहभागी होतील. 2 फेब्रुवारी रोजी हा प्रारंभ होणार असून हे पूजन अभियान 21 फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.
पूर्वतयारीसाठी कार्यकर्ता मेळावे
या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी कार्यकर्ता मेळावा उत्तर गेव्यात पर्वरी येथे विवेकानंद हॉल येथे सोमवार दि. 20 जानेवारी तर दक्षिण गोव्यात मडगाव येथे 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वा. आयोजित करण्यात आला आहे.
ही चळवळ सरकारला महाग पडणार
या म्हादई माता पूजन अभियानास 150 संस्था संघटनांचा पाठिंबा असून ते राजकारण विरहित आहे. त्या अभियानास कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल नाही. एक सामाजिक चळवळीच्या माध्यमातून हे अभियान होणार असून आज ना उद्या ते या सरकारला महाग पडणार असल्याचे संकेत वेलिंगकर यांनी दिले.
नार्वे येथील कार्यक्रमात सर्व 12 तालुका प्रतिनिधींना म्हादई उपनद्यांचे पाणी देण्यात येणार असून त्यानंतर संबंधित तालुक्यातील गावात पुजनाचे कार्यक्रम करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अवधूत कामत हे अभियानाचे संयोजक तर गोविंद देव हे अभियानाचे प्रमुख असल्याचे सांगण्यात आले.