घुसखोरी थांबवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यानच्या मुक्त संचारावर बंदी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी, इंफाळ
भारतातील मुक्त हालचाली रोखण्यासाठी भारत म्यानमारच्या सीमेवर कुंपण उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. जातीय संघर्षांपासून वाचण्यासाठी म्यानमारचे सैनिक मोठ्या संख्येने भारताकडे येत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे.
म्यानमार सीमेवरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पूर्णपणे कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सीमारेषेबरोबरच अतिरिक्त 300 किमीसाठी स्मार्ट कुंपण घालण्याचे आदेश सरकार जारी करणार आहे. सीमेवरील उर्वरित लांबीच्या कुंपणाचे काम येत्या साडेचार वर्षांत पूर्ण होण्याची शक्मयता आहे. सध्या चालू असलेल्या जातीय संघर्ष आणि म्यानमारमधून चिनी-कुकी नागरिकांचे बेकायदेशीर स्थलांतरादरम्यान केंद्र सरकारने अऊणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरामसह भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या तीन महिन्यांत म्यानमार लष्कराचे सुमारे 600 सैनिक भारतात दाखल झाले आहेत. भारत-म्यानमार सीमेवर अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. या अवैध मार्गांनाही आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मणिपूरमध्ये मे 2023 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सीमेवर कुंपण घालण्याच्या पद्धती तपासण्यासाठी केंद्राने एक प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पानुसार कार्यवाही होऊन स्मार्ट कुंपण पूर्ण झाल्यानंतर भारत-म्यानमार सीमेवरील मुक्त हालचाली बंद केल्या जातील. दोन्ही बाजूंनी प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संबंधित देशांचा व्हिसा घ्यावा लागणार आहे.