अष्टपैलू अश्विनचे तडाखेबंद शतक, विराटचेही आक्रमक अर्धशतक
चेन्नई / वृत्तसंस्था
सर्वप्रथम फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर गोलंदाजी कशी करावी, याचे धडे देणाऱया रविचंद्रन अश्विनने (148 चेंडूत 14 चौकार, 1 षटकारासह 106) तडाखेबंद शतक झळकावत आपला फलंदाजीतील मास्टरक्लास दाखवून दिला आणि त्याला विराटच्या (149 चेंडूत 7 चौकारांसह 62) आक्रमक अर्धशतकाची साथ मिळाल्यानंतर भारताने यजमान इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे खडतर आव्हान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडची तिसऱया दिवसअखेर 3 बाद 53 अशी दैना उडाली असून यामुळे भारतीय संघ विजयापासून केवळ सात पावलांच्या फरकावर उभा आहे.
चेपॉकवरील या मालिकेतील दुसऱया कसोटीत पहिल्या डावाअखेर 195 धावांची आघाडी घेणाऱया भारताने दुसऱया डावात सर्वबाद 286 धावा जमवल्या आणि त्यानंतर इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे आव्हान असेल, हे स्पष्ट झाले. पहिल्या दिवसापासूनच फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 53 धावांमध्येच 3 फलंदाज गमवावे लागले आणि उर्वरित 2 पूर्ण दिवस खेळून काढणेही किती दुरापास्त ठरु शकते, याचा त्यांना येथे काही अंशी अंदाज आला. उर्वरित दोन दिवस खेळून काढण्यासाठी अर्थातच इंग्लिश क्रिकेट संघाला चमत्काराची अपेक्षा करावी लागणार आहे.
अगदी धडाडीचा इंग्लिश कर्णधार जो रुट व प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनाही सदर आव्हान किती खडतर आहे, याची पुरेपूर कल्पना आहे. अर्थात, खडतर आव्हान असणे, याचा अर्थ अशक्य आव्हान नसते, यावर इंग्लिश चमूचा विश्वास आहे आणि म्हणूनच ते झुंजार खेळ साकारण्यावरच भर देत असतील तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
अश्विनने कसोटी कारकिर्दीतील एकाच सामन्यात शतक झळकावत 5 बळी घेण्याची ही तिसरी वेळ ठरली. इंग्लंडचा महान क्रिकेटपटू इयान बोथम या निकषावर 5 वेळा असा पराक्रम गाजवत अव्वलस्थानी विराजमान आहे. भारताने येथील लढतीत दुसऱया डावात दमदार फलंदाजी साकारली, त्यावेळी खेळपट्टीच खराब आहे, या विदेशी टीकेला देखील अप्रत्यक्षपणे सणसणीत चपराक बसली.
या सामन्यात पहिल्या दिवशी रोहितने दणकेबाज अर्धशतक झळकावल्यानंतर अश्विन व कोहली यांनी पुढील दोन दिवसात भारताचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करुन दिले. भारताच्या दुसऱया डावात एकवेळ 4 बाद 65 अशी स्थिती करत इंग्लंडने उत्तम सुरुवात केली. पण, नंतर अश्विन व कोहली यांनी सर्व सूत्रे हाती घेत जोरदार आक्रमण चढवले आणि या धक्क्यातून इंग्लंडच्या संघाला शेवटपर्यंत सावरता आले नाही.
विराट-अश्विनची सहज फलंदाजी
समयोचित अर्धशतक साजरे करणाऱया विराटने नेहमीच्या शैलीत सहज फलंदाजी करत फिरकी निष्प्रभ करुन टाकली. त्याने स्वीप फटक्यांचा पुरेपूर वापर केला. विराट व अश्विन यांनी 177 चेंडूत 96 धावांची साकारलेली भागीदारी अर्थातच महत्त्वपूर्ण ठरली. अश्विनने स्क्वेअर ऑफ द विकेट फटके खेळण्यावर अधिक भर दिला आणि इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. अश्विनच्या खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. त्याने स्क्वेअर कट व पूलचे फटके अगदी आत्मविश्वासाने खेळले
या मालिकेत रवींद्र जडेजा खेळत नसल्याने भारताला स्पेशालिस्ट फिरकीपटू अष्टपैलू खेळाची कसर जाणवणार का, हे प्रश्नचिन्ह होते. पण, अश्विनने अगदी ताकदीने जडेजाची जागा भरुन काढल्याचे तिसऱया दिवशीच स्पष्ट झाले. अश्विन 91 वरुन षटकार खेचत 97 धावांवर पोहोचला आणि त्यानंतर एका मिसटायमिंग फटक्यावर त्याने शतक साजरे केले. फलंदाजीत विराट बाद झाल्यानंतरही अश्विनने जिद्दीने फलंदाजी साकारत नवव्या गडय़ासाठी इशांत शर्मासमवेत 27 तर मोहम्मद सिराजसमवेत दहाव्या गडय़ासाठी 49 धावांची अविश्वसनीय भागीदारी साकारली होती. यात इशांतचा वाटा 7 तर सिराजचा वाटा 16 धावांचा राहिला. इंग्लंडतर्फे मोईन अली (4-98), जॅक लीच (4-100) यांनी एकत्रित 8 बळी गारद केले तर स्टोनने 21 धावात 1 बळी असे पृथक्करण नोंदवले.
इंग्लंडची दैना
विजयासाठी दुसऱया डावात 482 धावांचे कठीण आव्हान असताना अक्षर पटेलने 2 बळी घेताना डॉम सिबली व नाईट वॉचमन जॅक लीच यांना बाद केले तर अश्विनने रोरी बर्न्सला बाद करत इंग्लंडच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले. तिसऱया दिवसअखेर डॅन लॉरेन्स 38 चेंडूत 19 तर जो रुट 8 चेंडूत 2 धावांवर नाबाद राहिले.
धावफलक
भारत पहिला डाव- सर्वबाद 326.
इंग्लंड पहिला डाव-सर्वबाद 134.
भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा झे. फोक्स, गो. लीच 26 (70 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल पायचीत गो. लीच 14 (28 चेंडूत 1 षटकार), चेतेश्वर पुजारा धावचीत (पोप-फोक्स) 7 (23 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली पायचीत गो. अली 62 (149 चेंडूत 7 चौकार), रिषभ पंत यष्टीचीत फोक्स, गो. लीच 8 (11 चेंडूत 1 चौकार), अजिंक्य रहाणे झे. पोप, गो. अली 10 (14 चेंडूत 2 चौकार), अक्षर पटेल पायचीत गो. अली 7 (18 चेंडूत 1 चौकार), रविचंद्रन अश्विन त्रि. गो. स्टोन 106 (148 चेंडूत 14 चौकार, 1 षटकार), कुलदीप यादव पायचीत गो. अली 3 (9 चेंडू), इशांत शर्मा झे. स्टोन, गो. लीच 7 (24 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद सिराज नाबाद 16 (21 चेंडूत 2 षटकार). अवांतर 20. एकूण 85.5 षटकात सर्वबाद 286.
गडी बाद होण्याचा क्रम
1-42 (शुभमन, 11.2), 2-55 (पुजारा, 18.6), 3-55 (रोहित, 21.1), 4-65 (रिषभ, 25.3), 5-86 (रहाणे, 30.3), 6-106 (अक्षर, 36.1), 7-202 (विराट, 65.4), 8-210 (कुलदीप, 67.6), 9-237 (इशांत, 76.4), 10-286 (अश्विन, 85.5).
गोलंदाजी
स्टोन 6.5-1-21-1, जॅक लीच 33-6-100-4, मोईन अली 32-7-98-4, जो रुट 4-0-15-0, स्टुअर्ट ब्रॉड 9-3-25-0, डॅन लॉरेन्स 1-0-7-0.
इंग्लंड दुसरा डाव ः रोरी बर्न्स झे. कोहली, गो. अश्विन 25 (42 चेंडूत 4 चौकार), डॉम सिबली पायचीत गो. पटेल 3 (25 चेंडू), डॅन लॉरेन्स खेळत आहे 19 (38 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जॅक लीच झे. रोहित, गो. पटेल 0 (1 चेंडू), जो रुट खेळत आहे 2 (8 चेंडू). अवांतर 4. एकूण 19 षटकात 3 बाद 53.
गडी बाद होण्याचा क्रम
1-17 (सिबली, 8.2), 2-49 (रोरी बर्न्स, 15.6), 3-50 (लीच, 16.6).
गोलंदाजी
इशांत शर्मा 2-1-6-0, अक्षर पटेल 9-3-15-2, रविचंद्रन अश्विन 8-1-28-1.
कोटस
विदेशात आम्हाला हिरव्या खेळपट्टय़ा दिल्या जातात, त्याची आम्ही कधीही तक्रार केलेली नाही. अगदी एकही चेंडू हेल्मेटवर आदळलेला नाही, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. मी अश्विनसमवेत बरीच वर्षे खेळलो आहे आणि त्यामुळे माझी मानसिकता त्या दृष्टीने बदलली आहे.
-फिरकीपटू अक्षर पटेल
कोटस
आशियाई खंडात खेळताना फिरकीला पोषक खेळपट्टी असणार, हे आम्हाला अपेक्षितच असते. आमच्यासमोर 482 धावांचे कठीण आव्हान आहे. पण, काही वेळा सामन्याचा विजय किंवा पराभव यापेक्षा आणखी काही सकारात्मक बाबीही असतात.
-इंग्लिश संघाचे फिरकी गोलंदाजी सल्लागार जीतेन पटेल
माझ्या फलंदाजीचे सर्व सार केवळ या तीन दिवसातच सामावले आहे, असे अजिबात नाही. मात्र, या लढतीतील माझ्या शतकाचे सर्व श्रेय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना जाते. राठोड यांच्यासमवेत मी सातत्याने माझ्या फलंदाजीवर मेहनत घेत आलो आहे. चेन्नईत पुन्हा कसोटी केव्हा आहे, याचा मला अंदाज नाही आणि चेन्नईत मी खेळू शकणार का, याचीही मला कल्पना नाही.
–शतकवीर रविचंद्रन अश्विन
…तर चौथ्या गडय़ाच्या रुपाने रुटही बाद झाला असता!
विजयासाठी 482 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची एकवेळ 3 बाद 52 अशी स्थिती होती आणि डावातील 18 व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी कर्णधार जो रुट केवळ सुदैवानेच बाद होता होता बचावला. अक्षर पटेलसह सहकाऱयांनी रुट यष्टीमागे झेलबाद असल्याचे जोरदार अपील केले. अल्ट्राएजमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचे निदर्शनास आले नाही. त्यानंतर रुट पायचीत आहे का, हे पाहण्यात आले. बॉल ट्रकिंगमध्ये अम्पायर्स कॉल इम्पॅक्टवर होता. रुट येथे अगदी मिलिमिटरने बचावला. पण, मैदानी पंचांनी दिलेला अम्पायर्स कॉल कायम राहिला आणि यानंतर संतप्त विराटने त्यांच्याशी काही काळ हुज्जत घातली. अर्थात, रुट बाद झाला असता तर इंग्लिश संघ पराभवाच्या आणखी खाईत लोटला गेला असता, हे निश्चित होते.