लखनौ येथे पहिली लढत ः रोहितसेना युवा खेळाडूंना आजमावण्यावर भर देणार
लखनौ / वृत्तसंस्था
आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक युवा खेळाडू संघाचे दरवाजे ठोठावण्यासाठी सज्ज राहत आले असून आजपासून (गुरुवार दि. 24) श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया टी-20 मालिकेत भारतीय संघ अशा युवा खेळाडूंना आजमावण्यावरच भर देईल, असा होरा आहे. उभय संघातील पहिली टी-20 लढत आज सायंकाळी 7 वाजता खेळवली जाईल.
यापूर्वी, विंडीजचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडल्यानंतर बहरातील भारतीय संघ पाहुण्या लंकन संघाविरुद्ध देखील मालिकाविजयासाठी प्रबळ दावेदार असेल. मात्र, याचवेळी भारतीय संघाला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, शक्य तितक्या युवा खेळाडूंना संधी देण्यावर देखील लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. विराट कोहली, रिषभ पंत व केएल राहुल या मालिकेत उपलब्ध नसतील. त्यामुळे, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आदी खेळाडूंसाठी ही सुसंधी ठरु शकते.
कोहली नसल्याने श्रेयस अय्यरला सेट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. या मालिकेत धावा जमवण्यात सातत्य राखण्यात यश मिळवले तर विराट परतल्यानंतरही श्रेयसचा मधल्या फळीसाठी विचार होऊ शकतो. ऋतुराज गायकवाड व अय्यर विंडीजविरुद्ध तिसऱया टी-20 लढतीत अपयशी ठरले. त्याची कसर येथे भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. गत आठवडय़ात वेंकटेश अय्यरने अष्टपैलू खेळ साकारत संघव्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले होते. आता सुर्यकुमार यादव व दीपक चहर संघातून बाहेर फेकले गेले असल्याने वेंकटेशवर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.
संजू सॅमसनचा संभाव्य संघात समावेश असून त्याला अंतिम एकादशमध्ये खेळवले जाणार का, हे पहावे लागेल. फिरकीपटू रवि बिश्नोईने पदार्पणाच्या टी-20 मालिकेत लक्षवेधी कामगिरी साकारली असून येथेही तो हीच घोडदौड कायम राखण्याची अपेक्षा असेल. स्पीडस्टार बुमराहच्या पुनरागमनामुळे संघाची गोलंदाजी आणखी मजबूत झाली असून भुवनेश्वर कुमार व सिराज यांची त्याला साथ असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), अवेश खान.
श्रीलंका ः दसुन शनाका (कर्णधार), पथूम निस्सांका, कुशल मेंडिस, चरिथ असलंका (उपकर्णधार), दिनेश चंडिमल, दनुष्का गुणथिलका, कमिल मिशरा, जनिथ लियानगे, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महिश तिक्षणा, जेफ्री व्हॅन्डरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियान डॅनिएल.
सामन्याची वेळ ः सायं. 7 पासून.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार
दीपक चहर, सुर्यकुमार यादव टी-20 मालिकेतून बाहेर
जलद गोलंदाज दीपक चहर व मध्यफळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव लंकेविरुद्ध आगामी टी-20 मालिकेतून बाहेर फेकले गेले आहेत. यापूर्वी, रविवारी कोलकात्यात विंडीजविरुद्ध झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 लढतीत दीपक चहरला गोलंदाजी करताना दुखापत झाली तर सुर्यकुमार यादवला क्षेत्ररक्षण करत असताना हेअरलाईन प्रॅक्चरला सामोरे जावे लागले. हे दोन्ही खेळाडू बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला रवाना होणार आहेत.
लंकन फिरकीपटू वणिंदू हसरंगा पुन्हा कोरोनाग्रस्त
श्रीलंकन फिरकी अष्टपैलू वणिंदू हसरंगा पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त झाला असून यामुळे भारताविरुद्ध टी-20 मालिकेत तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. रॅपिड अँटिजन टेस्ट व पीसीआर अशा दोन्ही चाचणीत हसरंगाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे श्रीलंकन क्रिकेट मंडळाने बुधवारी जाहीर केले. आता निगेटिव्ह रिपोर्ट येईतोवर त्याला आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे, असे त्यांनी येथे जाहीर केले. हसरंगा यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरु असताना कोरोनाग्रस्त झाला व यामुळे त्याला शेवटच्या काही टी-20 सामन्यात खेळता आले नव्हते.
भारत-लंका मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
24 फेब्रुवारी / पहिली टी-20/ लखनौ
26 फेब्रुवारी / दुसरी टी-20 / धर्मशाला
27 फेब्रुवारी / तिसरी टी-20 / धर्मशाला
4 ते 8 मार्च / पहिली कसोटी / मोहाली
12 ते 16 मार्च / दुसरी कसोटी / बेंगळूर
रोहित म्हणतो, आवश्यकता असेल तरच ब्रेक घेणार!
बायो-बबलची आता सवय झाली असून सातत्याने खेळत राहण्यात मला काहीही अडचण वाटत नाही. ज्यावेळी आवश्यकता भासेल, त्याचवेळी मी ब्रेक घेईन, असे भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. अलीकडेच रोहितची कसोटी कर्णधारपदीही नियुक्ती झाली असून भारतीय संघ यानंतर भरगच्च क्रिकेट खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा बोलत होता.
‘सध्याच्या घडीला माझ्यासमोर अशी कोणतीही चिंता नाही आणि मी सर्व सामने खेळत राहणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंटचा ज्या-त्या वेळेस विचार होत असतो आणि आवश्यकता असेल, त्यावेळी निर्णय घेतला जाईल’, असे त्याने याप्रसंगी स्पष्ट केले. भारतीय खेळाडू लंकेविरुद्ध मालिकेनंतर आयपीएल स्पर्धेत खेळतील. त्यानंतर इंग्लंड दौरा, मायदेशात द. आफ्रिकेविरुद्ध मालिका, झिम्बाब्वे दौरा, पाकिस्तानमध्ये आशिया चषक व ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकप स्पर्धा असा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम असणार आहे.