गुलाबी चेंडूवर श्रीलंकेची आणखी खडतर परीक्षा अपेक्षित
बेंगळूर / वृत्तसंस्था
जवळपास 28 महिन्यांमध्ये एकही शतक झळकावू न शकलेला विराट कोहली आजपासून (शनिवार दि. 12) खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी लंकन संघाविरुद्ध शतकांचा हा दुष्काळ संपुष्टात आणणार का, याची उत्सुकता असेल. लंकन संघ मुळातच कमकुवत असून त्यातच त्यांना दुखापतीचे ग्रहणही लागले आहे. त्यातच ही लढत दिवस-रात्र असल्याने गुलाबी चेंडूंवर त्यांना आणखी खडतर परीक्षेला सामोरे जावे लागले तर यात आश्चर्य नसेल. दुपारी 2 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे.
मागील दशकभरापासून विराट कोहली आयपीएल प्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे प्रतिनिधीत्व करत असून एका अर्थाने त्याच्यासाठी चिन्नास्वामी हे होम ग्राऊंडच आहे. याशिवाय, येथील खेळपट्टीची उत्तम जाण असल्याने ही बाब देखील त्याच्या पथ्यावर पडू शकते.
विराटने जागतिक क्रिकेटमध्ये जी उंची गाठली, त्यामुळे, नेहमीच त्याच्याकडून अधिक अपेक्षा असतात. मात्र, या अपेक्षांमुळेच विराट आपल्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक पर्वातून जात आहे. लंकन गोलंदाजी लाईनअप अगदी त्यांच्या भूमीत खेळत असती तरी त्यांना विराटला पेचात टाकणे शक्य झाले नसते. त्यांच्यावरील ही मर्यादाच विराटसाठी सुसंधी ठरु शकते.
यापूर्वी मोहाली कसोटी सामन्यात विराटने उत्तम सुरुवात केली. पण, तो याचा पुरेपूर लाभ घेऊ शकला नव्हता. वास्तविक, आताही त्याचे ट्रेडमार्क फटके गोलंदाजांना घायाळ करुन जात आहेत. पण, किंचीत एकाग्रता भंगली तरी याचा त्याला फटका बसत आला आहे. तुलनेने छोटय़ा मैदानावर लंकन दुबळय़ा गोलंदाजांचा सामना करताना विराटला सूर सापडला, नशिबाने साथ दिली तर त्याचे शतकही फारसे दूर नसेल, असेच सध्याचे चित्र आहे.
लंकेसमोर आव्हानांचा डोंगर
मध्यमगती गोलंदाज लाहिरु कुमारा धोंडशिरेच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर फेकला गेला असताना आता दुष्मंता चमीराही गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असून यामुळे लंकन संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दुष्मंताची जागा आता चमिका करुणारत्ने घेईल, असे लंकन व्यवस्थापनाने जाहीर केले. मागील सामन्यात लक्षवेधी योगदान देणारा पथुम निसांका देखील दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत लंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेवर बरीच भिस्त असणार आहे. मागील दोन्ही डावात उत्तम सुरुवात केली असली तरी तो याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नव्हता. अँजिलो मॅथ्यूजला देखील आपली कामगिरी उंचवावी लागेल.
आपली शेवटची मालिका खेळत असलेला मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमल 6 गोलंदाजांमध्ये चारपेक्षा कमी इकॉनॉमी राखणारा एकमेव ठरला. अन्य लंकन गोलंदाजांची मात्र भारतीय फलंदाजांनी बरीच धुलाई केली आणि यात रविंद्र जडेजा (नाबाद 175) व रिषभ पंत (96) यांचा प्राधान्याने समावेश राहिला.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रेयस अय्यर, कोना भरत (यष्टीरक्षक), उमेश यादव, सौरभ कुमार, प्रियांक पांचाळ.
श्रीलंका ः दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजया डीसिल्व्हा, चरिथ असालंका, दुष्मंता चमीरा, दिनेश चंडिमल, अँजिलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्वा फर्नांडो, सुरंगा लकमल, लाहिरु थिरिमने, लाहिरु कुमारा, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसांका, जेफ्री व्हॅन्डरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने.
सामन्याची वेळ ः दुपारी 2 पासून.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.
या वर्षात भारताचा मायभूमीतील शेवटचा कसोटी सामना
भारतीय क्रिकेट संघासाठी 2022 मधील हा मायदेशातील शेवटचा कसोटी सामना असेल. लंकेविरुद्ध मालिकेनंतर भारतीय संघ विश्व कसोटी चॅम्पियनशिपअंतर्गत आणखी 7 कसोटी सामने खेळेल. मात्र, हे सर्व सामने विदेशी भूमीत असणार आहेत. लंकेविरुद्ध मालिकेनंतर भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशला रवाना होईल. मागील इंग्लंड दौऱयातील आणखी एक कसोटी सामनाही बाकी आहे. त्यानंतर पुढील वर्षात ऑस्ट्रेलियन संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱयावर येणार आहे.
सलग 68 डावात विराट शतकापासून दूरच
नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता कसोटीत 136 धावा झळकावल्यानंतर विराट कोहलीला त्यानंतर 68 आंतरराष्ट्रीय डावात एकही शतक नोंदवता आलेले नाही. कोलकात्यातील त्या शतकी खेळीनंतर विराटने 22 अर्धशतके झळकावली. पण, यातील एकाही खेळीचे तो शतकात रुपांतर करु शकला नाही. यंदा जानेवारीत केपटाऊन कसोटीत 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
कसोटी व वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक डावात शतकापासून दूर राहण्याचा विक्रम केरॉन पॉवेलच्या खात्यावर असून सलग 94 डावात तो एकही शतक झळकावू शकला नव्हता.
‘तो’ योगायोग विराटला फळणार का?
नोव्हेंबर 2019 मध्ये विराटने शेवटचे शतक साजरे केले, तो सामना दिवस-रात्र होता आणि गार्डन सिटीवर आजपासून खेळवली जाणारी लढतही दिवस-रात्रच आहे. त्या लढतीत शतक झळकावणारा विराट येथे शतकाचा दुष्काळही संपुष्टात आणणार का, याची उत्सुकता असेल.
कसे असेल टीम कॉम्बिनेशन?
बेंगळूरमधील ही कसोटी दिवस-रात्र स्वरुपात खेळवली जाणार असल्याने अंतिम एकादशमध्ये जयंत यादवऐवजी अष्टपैलू अक्षर पटेल किंवा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजला खेळवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी जयंत यादवला मोहाली कसोटीतील दोन्ही डावात 17 षटकांमध्ये एकही बळी घेता आला नव्हता. त्या तुलनेत अक्षर पटेल, सिराज अधिक प्रभावी ठरले आहेत.
अक्षरने आपल्या शेवटच्या दिवस-रात्री कसोटीत अहमदाबादमध्ये इंग्लंडचे 11 फलंदाज गारद करत एकच खळबळ उडवून दिली होती. इंग्लंडच्या दुसऱया डावात पहिल्या षटकातच तो नव्या चेंडूवर गोलंदाजीला आला होता. मात्र, खेळपट्टीवर गवत असेल तर कर्णधार रोहित शर्मासाठी सिराज हा सरस पर्याय ठरु शकतो. तिसऱया स्थानी पुन्हा हनुमा विहारीला संधी मिळणार का, हे देखील नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल.