वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा क्रिकेट संघ लंकेच्या दौऱयावर असून उभय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहेत. उभय संघातील वनडे मालिकेला 18 जुलैपासून प्रारंभ होईल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.
लंकेच्या दौऱयावर भारताचा दुय्यम संघ पाठविण्यात आला आहे. तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला यापूर्वी 13 जुलैपासून प्रारंभ केला जाणार होता. पण, लंकन संघातील 2 सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने सदर मालिका लांबणीवर टाकण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. लंकन संघाचे फलंदाज प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर आणि डाटा ऍनालिस्ट जीटी निरोशन हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. फ्लॉवर आणि निरोशन हे ब्रिटनच्या दौऱयावरून लंकेत दाखल झाले होते.
भारतीय संघातील खेळाडूंच्या क्वारंटाईन कालावधीमध्ये आता वाढ केली जाणार आहे. 17 जुलैपर्यंत क्वारंटाईनचा कालावधी राहील, असे जय शाह यांनी सांगितले. भारत-लंका यांच्यातील वनडे मालिकेतील तीन सामने 18, 20, 23 जुलै रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. त्यानंतर उभय संघातील टी-20 तीन सामने 25, 27 अणि 29 जुलै रोजी प्रेमदासा स्टेडियमवरच होणार आहेत.