ऑनलाईन टीम / पुणे :
देशात डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल असे आश्वासन भारत सरकार देत आहे. मात्र, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा मारत असून त्यांनी थापा मारणे बंद करावे, अशी टीका पुण्यातील ‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी सरकारवर केली आहे.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळय़ानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.
ते म्हणाले, राजकीय लोक थापा मारत आहेत. त्यांनी सांगितलेल्या मुदतीत लसीकरण शक्य नाही, असे परखड मत त्यांनी मांडले. पुढे ते म्हणाले, कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांना बसत आहे. त्यामुळे पुणे, मुंबईत अधिक लस देण्यात याव्यात, असे आम्ही केंद्र सरकारला सांगितले होते. आमची पुरवठा करण्याची तयारी देखील होती. मात्र, मोदी सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही.
- लसीचा कॉकटेल डोस अयोग्य
सध्या चर्चेत असलेल्या कॉकटेल डोसला विरोध दर्शवत पुनावाला यांनी कॉकटेल डोस अयोग्य असल्याचे म्हटले आहे. अशा वेगवेगळय़ा लसी घेऊन काही चुकीचे घडल्यास प्रत्येक जण स्वतःच्या लसीचे समर्थन करणार आणि दुसऱयाचे दोष काढणार. अशा वेळी जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारने लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे. कोविशिल्ड लसीचा प्रभाव टिकवण्यासाठी बुस्टर लसीची गरज पडेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. मी आणि माझ्या कर्मचाऱयांनी तिसरा डोस घेतला आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे.
- मला लोकांच्या दुःखातून पैसे कमवायाचे नाहीत
पुढे ते म्हणाले, कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. देवाचा कोप होईल या भीतीने काहींनी उपचार नाकारले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पण लक्षणे दिसताच लगेच उपचार घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होईल. मला लोकांच्या दुःखातून पैसे कमवायाचे नाहीत. मी लस विकून पैसे बनवायला बसलेलो नाही. मात्र लोकांनी लस घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
- पुन्हा लॉकडाऊन नको
दरम्यान, राज्य सरकारने कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाऊन नको अशी भूमिका मांडली.