सध्या पेगॅसिस हे हेरगिरी करणारे स्पायवेअर चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यासंबंधी सुनावणीही सुरू आहे. तथापि, आपल्या मोबाईलमध्ये शिरून आपला डाटा पळविणारे किंवा हेरगिरी करणारे हे एकमेव सॉफ्टवेअर नाही. सध्या भारत रॅनसमवेअर नामक मोबाईल संकटाचा शिकार बनत आहे, असा इशारा अनेक संगणकतज्ञांनी दिला आहे. रॅनसमवेअरच्या माध्यमातून भारतातील असंख्य संगणक आणि स्मार्टफोन्सवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. हे सॉफ्टवेअर आपल्या स्मार्टफोनमध्ये शिरून तो लॉक करून टाकते. अशी अनेक प्रकरणे सायबर सेलकडे नोंदविण्यात आलेली आहेत. रॅनसमवेअर हा एक संगणक व्हायरस असून तो आपल्याला पत्ता लागू न देता संगणकात किंवा स्मार्टफोनमध्ये शिरकाव करतो. संगणकात किंवा स्मार्टफोनमध्ये साठविलेली सर्व माहिती एन्क्रीप्ट करतो. त्यामुळे ही सर्व माहिती हा व्हायरस घुसवणाऱया व्यक्तीला मिळू शकते. अशा प्रकारे मोबाईलधारकाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. एकदा मोबाईल या व्हायरसच्या नियंत्रणात गेल्यानंतर त्याचा धारक काहीही करू शकत नाही. हे मालवेअर स्मार्टफोनमधून काढून टाकता येत नाही, असेही दिसून आले आहे.
या व्हायरसच्या माध्यमातून हॅकर आपला डाटा ब्लॉक करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो. पैसे न दिल्यास मोबाईल निरुपयोगी होऊ शकतो. हॅकर्सनी कित्येकांकडे बिटकॉईन या आभासी चलनाची मागणी केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. हा व्हायरस चीनमधील एका ऍडव्हान्स्ड ग्रुपने तयार केला असल्याचा आरोप आहे. या ग्रुपला चीनच्या सरकारचे आशीर्वाद असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारचे जेवढे सायबर हल्ले भारत आणि अमेरिकेत झालेले आहेत, त्या सर्वांमध्ये कुठे ना कुठे चीनचा संबंध आलेला आहे.
मात्र, या रॅनसमवेअरपासून वाचण्याचे काही उपायही आहेत. या व्हायरसमुळे सर्वाधिक नुकसान साठवलेल्या माहितीचे होते. त्यामुळे आपल्या डाटाचा बॅकअप ठेवणे आवश्यक आहे. हा बॅकअप नेहमीच्या मोबाईलमध्ये किंवा संगणकात न करता स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक आहे. बॅकअप हार्डड्राईव्हमध्ये ठेवल्यास सुरक्षित राहतो, असे दिसून आले आहे. रॅनसमवेअरचा हल्ला झाल्यानंतर आपला डाटा अनलॉक करण्यासाठी पैसे मागितले जातात. पण पैसे देऊनही डाटा अनलॉक होईल याची शाश्वती नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बॅकअप ठेवणे हाच सध्या तरी सर्वोत्तम उपाय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.