मोदी पंतप्रधान झाल्यापासून आंतरराष्ट्रीय जगतात ‘न भूतो, न भविष्यती’ अशा प्रकारे भारताची प्रति÷ा वाढली आहे असे दावे वारंवार केले जात होते. आता आक्रमक चीन दाराशी उभा ठाकला असताना हा दावा किती बरोबर अथवा चूक हे कळून येणार आहे.
भारताचा शेजारी चीन ‘डॅगन’ म्हणून ओळखला जातो. ड्रगन म्हणजे एक अति प्रचंड आग ओकणारा असा पुराणातील साप. आता या ड्रगनने सीमेवर अचानक आपले रंग दाखवायला सुरुवात केल्याने ‘वाघ’ म्हणून ओळखला जाणारा भारत साहजिकच सावध झाला आहे. 21 वे शतक म्हणजे आशिया खंडाचे शतक म्हणून ओळखले जाते. अशावेळी फक्त आशियाचेच नव्हे तर साऱया जगाचे नेतृत्व करण्याची स्वप्ने बघणारा चीन हे नेतृत्व मिळवण्यासाठी घायकुतीला आलेला आहे. पूर्व लडाखमधील दुर्गम हिमालयी सरहद्दीवर चीनने गेल्या एक महिन्यापासून हळूहळू घुसखोरी सुरू केली असून भारताला डिवचले आहे. यात कोणत्याही पद्धतीने गप्प बसणे नवी दिल्लीला परवडणारे नाही म्हणून जर वेळ पडलीच तर हिमालयात शत्रूशी दोन हात करण्याची तयारी भारताने चालवली आहे. ‘आले अंगावर तर घेतले शिंगावर’ असा हा प्रकार राहणार असे दिसत आहे. पण तत्पूर्वी विविध स्तरावर वाटाघाटींद्वारे स्थिती निवळण्याचे मार्ग काढले जात आहेत. त्यांना कितपत यश मिळणार ते पुढील काही आठवडय़ात बघायला मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या या आगळिकीबद्दल जाहीरपणे अवाक्षर काढलेले नाही. जेव्हा परिस्थिती नाजूक असते तेव्हा असे बोलणे बरोबरही नसते. पण संरक्षण मंत्री राजनाथसिंग या विषयावर जे काही बोलले आहेत त्याने वादच जास्त माजला आहे. भारत आणि चीनमधील नियंत्रण रेखाच स्पष्ट नसल्याने चिनी फौजांनी घुसखोरी केली आहे असा युक्तिवाद राजनाथ यांनी केला आहे. पण उत्तरी सेनेचे एकेकाळी प्रमुख राहिलेले लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) एच एस पनाग यांनी अशी भूमिका भारताच्या अंगलट येऊ शकते असे ठामपणे बजावले आहे. कारण अशी भूमिका घेतली तर ‘भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी’ या न्यायाप्रमाणे चीनची घुसखोरी वाढतच राहील असे त्यांचे म्हणणे आहे.
अवघड जागेचे दुखणे
चीनची घुसखोरी हे मोदी सरकारकरता अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे असे सद्यातरी दिसत आहे. एकीकडे कोरोनाचे महासंकट दिवसेंदिवस वाढतच आहे त्याचा मुकाबला करण्यात सरकारच्या नाकी नऊ आले असताना टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थाच बसल्याने हाहाकार माजला आहे. चीनचे सर्वेसर्वा शी जीन पिंग यांनी जगभर आपले नेतृत्व प्रभावीपणे प्रस्थापित करण्यासाठी भारताला जणू खिंडीतच पकडले आहे.
चीनचे अभ्यासक समजले जाणारे भाजपचे जे÷ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा तर असा दावा आहे की चीनची ही खेळी म्हणजे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कणखर नेता’ या प्रतिमेला धक्का द्यायचा आहे व त्यांचे नेतृत्व कमजोर करायचे आहे. ज्याप्रमाणे 1962 साली आक्रमण करून चीनने जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेला तडा दिला तसे आता त्यांना मोदींच्या बाबत करावयाचे आहे’, असा स्वामी यांचा दावा आहे. तो कितपत खरा अथवा खोटा हे काळच दाखवेल पण स्वामी यांच्या सांगण्याचा मथितार्थ असा की ‘दादा बाबा करून चीन मानणार नाही आणि भारताला एक प्रकारे अद्दल घडवण्यासाठीच त्याने ही घुसखोरी केलेली आहे.’
शनिवारी लेफ्टनन्ट जनरल एवढय़ा उच्च स्तरावर वाटाघाटी तब्बल साडेपाच तास झाल्या त्यातून हे गुऱहाळ दीर्घकाल चालेल असेच संकेत मिळत आहेत. गंभीर गोष्ट अशी की या वाटाघाटींनंतर चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ‘आम्ही एक इंचदेखील जमीन सोडणार नाही’ अशी दर्पोक्ती केली आहे. त्याचबरोबर भारताने बऱया बोलाने चीनचे ऐकले नाही तर त्यावर अवघड प्रसंग ओढवेल अशी तंबी ही दिली आहे. ‘एक तर चोर त्यात शिरजोर’ असाच हा मामला दिसत आहे.
चीनच्या काही अभ्यासकांच्या मते शी जीन पिंग हे कोविड प्रकरणी जगभरातून झालेले आरोप तसेच हाँगकाँगमधील वाढती निदर्शने, दक्षिण चीन समुद्रातील ताज्या घडामोडी आणि तैवानप्रश्नी देशांतर्गत चांगलेच अडचणीत आले आहेत आणि त्यावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी चालवली आहे.
तात्पर्य काय तर भारतापुढे लडाखमधील हे चिनी आव्हान हिमालयासारखे प्रचंड आहे. याचा अर्थ भारत लेचापेचा आहे असे नाही. 1962 म्हणजे इतिहास झालेला आहे. त्यानंतर भारतीय सैन्य खूपच मजबूत झालेले आहे आणि याची प्रचिती 1967 पासून वेळोवेळी चीनला आलेली आहे. भारताने ज्या माऊंटन डिव्हिजन्स उभारल्या आहेत त्या चीनशी दोन हात करण्यासाठीच. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी सीमाभागात मोठय़ा प्रमाणात रस्ते बनवल्याने भारताला अतिशय फायदा झालेला आहे. आता भारतीय फौजांना ताबडतोब कुमक मिळू शकत असल्यामुळे चीनचा पोटशूळ वाढला आहे.
भारताच्या बाजूने एक चांगली गोष्ट ही की अमेरिका आणि युरोपमधील प्रगत देश चीनच्या वाढत्या दादागिरीला कंटाळले आहेत. त्याचबरोबर दक्षिण चीन समुद्रात चीनने घातलेल्या हैदोसाने व्हिएतनाम, थायलंड, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, न्यूझीलण्ड आणि ऑस्ट्रलिया असे बरेच देश वैतागले आहेत. त्यामुळेच जणू काही डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जी 7’ या प्रगत देशांच्या संघटनेचा विस्तार करून भारतासह काही लोकशाही शक्तींचा समावेश करण्याची कल्पना मांडली आहे. हिमालयातील वाद जास्त चिघळला तर त्याचे जास्त दुष्परिणाम चीनला भोगावे लागणार आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यापासून आंतरराष्ट्रीय जगतात ‘न भूतो, न भविष्यती’ अशा प्रकारे भारताची प्रति÷ा वाढली आहे असे दावे वारंवार केले जात होते. आता आक्रमक चीन दाराशी उभा ठाकला असताना हा दावा किती बरोबर अथवा चूक हे कळून येणार आहे. ही लढाई सरतेशेवटी आपली आपल्याला लढायची आहे. भारतीय सेनेने देशाची मान कधीच झुकू दिलेली नाही.
सुनील गाताडे