अर्जुनाने आतापर्यंत द्रोणाचार्यांकडून घेतलेली विद्या एकाग्र चित्ताने आत्मसात केली होती. युद्धातले डावपेच, विविध अस्त्र आणि शस्त्रास्त्रांचा अचूक वापर यात तो पारंगत झालाच होता.
आपले गुरू द्रोणाचार्यांचा लाडका शिष्यही बनला होता. शिवाय इंद्राचीही कृपा त्याच्यावर होतीच. पण आता मात्र त्याला एकटय़ालाच ही कठोर तपस्या करून शिवशंकरांकडून ‘पाशुपतास्त्र’ मिळवायचे होते. इंद्रकील पर्वताच्या सुंदर आणि शांत परिसरात ही उग्र तपश्चर्या सुरू झाली. आपल्या तेजाने त्या परिसरावर आणि तिथल्या वनचरांवरही प्रभाव पाडला. वनचर कष्टी झाले. त्यांना हिंडाफिरायला त्रास होऊ लागला. खाणे मिळेनासे झाले. ते सगळे शेवटी इंद्राकडे गेले आणि अर्जुनाच्या तपाबद्दल त्याला सांगितले. आपल्या पुत्राबद्दल हे सारे ऐकून इंद्राला आनंद झाला, पण तो उघड करू शकला नाही. त्याने अर्जुनाची परीक्षा घेण्याचे ठरवले. इंद्र आपल्या तपात किती एकाग्र झाला आहे हेच त्याला पहायचे होते.
इंद्राने काही अप्सरांना अर्जुनाचा तपोभंग करण्याचे काम दिले. तो त्यांना म्हणाला, ‘आपल्या नेत्रकटाक्षांनी अर्जुनाला घायाळ करा. कदाचित क्रोधित होऊन तो तुम्हांला शापही देईल. पण तुम्ही घाबरू नका.’ इंद्राची आज्ञा पाळून अप्सरा आपल्या कामगिरीवर निघाल्या. एकापेक्षा एक साऱया लावण्यवती होत्या. त्यात विविध अलंकारांनी त्यांचे रूप अधिकच खुलले होते. त्यांनी अर्जुनाच्या तपोवनात येऊन मोठमोठय़ाने गप्पा मारायला सुरूवात केली. अर्जुनाच्या तपात विघ्न निर्माण करणे हाच त्यांचा उद्देश होता. त्या मादक हावभाव करू लागल्या. पण अर्जुन विचलित झाला नाही. तो जितेंद्रिय होता. शेवटी कंटाळून त्या परत स्वस्थानी जाण्यास निघाल्या. स्वर्गात पोहचल्यावर अप्सरांनी अर्जुनाच्या इंद्रियांवर मिळवलेल्या विजयाबद्दल इंद्राला सांगितले. ते ऐकून इंद्र संतुष्ट झाला. ह्या परीक्षेत अर्जुन उत्तम रितीने उत्तीर्ण झाला होता. पण इंद्राला आणखी एक परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी त्याने स्वतःच एका मुनीचा वेष धारण केला आणि तपोवनात गेला. मुनिंच्या दर्शनाने अर्जुन प्रभावित झाला. त्याने अत्यंत आदराने त्यांची पूजा आणि आदरसत्कार केला. मुनींना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. मुनीवेषधारी इंद्र त्याला बोलण्यात गुंतवून ह्या तपश्चर्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागला. करे श्लाघ्यस्त्यागः शिरसि गुरुपादप्रणयिता।मुखे सत्या वाणी विजयि भुजयोर्वीर्यमतुलम्।। ह्र्दीस्वच्छा वृत्तिः श्रुतिमधिगतं च श्रवणयोः। विनाप्यैश्च्रर्येण प्रकृतिमहतां मण्डणनमिदम्।।
हातात स्तुत्य त्याग, गुरूचरणी नतमस्तक असणे, मुखी सत्यवाणी, बाहूंच्या ठिकाणी विजयी अतुलनीय शक्ती, ह्रदयी निर्मळ वृत्ती, कानांनी ऐकलेले व प्राप्त झालेले ज्ञान …हे ऐश्वर्याशिवाय मोठय़ा माणसांच्या ठिकाणी प्रकृतीनेच दिलेले अलंकार आहेत.