प्रतिनिधी/ सातारा
शेतामध्ये खोप…त्याला बोराटीची झाप..तिथ राबतो माझा बाप..,शिक बघ शिक…लढायला शिक..घेतलेली कर्ज बुडवायला शिक, कुणब्याचा पोरा पाडायला शिक..,अशा भावपूर्ण कविता सादर करुन कवी इंद्रजीत भालेराव यांच्या काव्य मैफिलींने 21 व्या ग्रंथ महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. भालेराव यांनी घेतलेले अनुभव शब्दबद्ध करताना त्याला विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी टाळय़ांच्या कडकडाटात उत्सुर्फपणे दाद दिली. तर त्यांनी त्यांच्या आईवरील कविता वाचन केल्यानंतर उपस्थितांच्या डोळय़ातून अश्रू आले. दरम्यान, 21 वर्षापूर्वी ज्यांच्या संकल्पनेतून ग्रंथ महोत्सव हा सुरु झाला त्या शिक्षण उपसंचालक दिनकर पाटील यांनीही संवाद साधला.
21 व्या ग्रंथ मह्त्सोवाच्या उद्घाटन सोहळय़ावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण उपसंचालक दिनकर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रमेश चव्हाण, सुनीताराजे पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भालेराव म्हणाले, मी साताऱयाचा आहे. माझ सातारा गाव आहे. राजेंद्र माने यांनी कधी बोलवलं, त्यांनी लिहिलेली छान छान पत्रे आहेत. पाटणे सरांच्यामुळे आर. आर. आबा माझ्या आयुष्यात आले. राजकारणाबाहेरचे आबा मला कळले. कुटुंबवस्तल आबा पाहिले.माझ्या आईच्या खाटेवर बसून भाकरी कसे खायचे ते आठवते. ते माझ्या वाटय़ाला आले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी मला साताऱयाने दिली. शंकर सारडा यांनी दिली. या व्यासपीठाने दिली. त्यावेळी अभयसिंहराजे भोसले होते. हे मी वेळोवेळी लिहिले आहे. ग्रंथमहोत्सव आपल्या महाराष्ट्राला माहिती नव्हता. ग्रंथ महोत्सवाची माहिती नव्हती. ग्रंथ महोत्सव होत नसत. जत्रा होत असत. यात्रा होत असत. ग्रंथ वाचन होत असत. ग्रंथ पूजन होत असत. बाहेर जगभरात वल्ड बुक फेअर होतात. पुस्तक मेला होतो. ग्रंथ महोत्सव सुरु करण्याची संकल्पना दिनकर पाटलांनी सुरु केली. एक वर्ष नाही 21 वर्ष हा महोत्सव भरतो आहे. साताकर भूमिकेच्या पाटीमागे आहेत. आगळावेगळा ग्रंथ महोत्सव आहे. असे दुसरीकडे ग्रंथ महोत्सव होत नाहीत. शासकीय पातळीवर शासकीय ग्रंथ महोत्सव होतात, असे त्यांनी सांगितले.
दिनकर पाटील म्हणाले, भारत हा देश 2020 साली सगळ्यात तरुण देश आहे. देशाचे सध्याचे सरासरी वय 29 असे आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणायचे त्याप्रमाणेच देश तरुण होत आहे. आज आपल्या समोर बसलेली पिढी आहे. ती माहिती तंत्रज्ञानाच्या जवळ गेली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत. त्यामुळे सगळं जग मुठीमध्ये आले आहे. माहितीचे ज्ञानात कस रूपांतर होणार?, ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून ते फुलत आहे. भविष्यात ज्यांच्याकडे ज्ञान असेल तोच श्रीमंत असेल. पुस्तकाच्या रुपात आत्मसात केलं तर ज्ञान. शिक्षकाना सातवा वेतन आयोग मिळाला, पण आमच्या शाळा कधी सेव्हन स्टार होणार,विध्यार्थी कधी स्टार होणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजेश क्षीरसागर म्हणाले, या ग्रंथ महोत्सवात चार दिवस साहित्यिकांची मेजवानी असते. पाचव्या दिवशीही यावर्षी आहे ती फक्त शिक्षकांसाठी असेल. अरुणा ढेरे साताऱयात दि.7 रोजी येत आहे. मराठी शिक्षकांसाठी सैनिक स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 वा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असा आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सुनीता कदम सूत्रसंचालन केले. स्वागत राजेश क्षीरसागर यांनी केले. यावेळी साहेबराव होळ, नंदा जाधव, संध्या चौगुले, कुमुदिनी मंडपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरोजिनी बाबर यांच्या आत्मचरित्राचे आणि मी कसा घडलो या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
भालेराव यांच्या पुस्तकांना मोठी मागणी
भालेराव हे स्वतः बद्दल सांगत होते. ते म्हणाले, मी चौथीत फुकट पाच, सातवीत ढकल पास आणि दहावीत नापास झालेला विद्यार्थी आहे. वडिलांनी दहावी नापास झाल्यावर विचारले काय करणार, गुर राखणार असे उत्तर दिले. वर्षभर गुर राखली. गुर अशी राखली की जगात रेकॉर्ड होईल असे. कारण मी पुढे असायचो तर माझी गुर पाठीमागे असायची. एखाद जनावर शेतात गेलं तर त्याच्या गळय़ाला धरुन मी बाहेर आणायचो किंवा मीच बाहेर रडत बसायचो. रडत बसत असल्यावर शेजारी गाय येवून मला मायेने चाटायची. एवढा लळा लावलेला होता. त्या वर्षा दीड वर्षाच्या काळातच मला जे काही अनुभव आले तेच शब्दबद्द केले. तेच पुस्तकरुपाने पुढे आले, असे भालेराव यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी आपल्या पुस्तकांचा स्टॉल भाषणादरम्यान लावला गेला. बघताबघता त्यांच्या पुस्तकांची हातोहात विक्री झाली.