अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला ते सर्वांच्या देहात राहून देहाचे चलनवलन कसे घडवून आणतात ते समजाऊन सांगत आहेत. ते म्हणाले उद्धवा, देह तर अचेतन आहे. त्याच्याने कर्म होत नाही. इंद्रियांना चेतविणारा, कर्म, क्रिया किंवा कर्तव्य करणारा मुख्य कर्ता तो हृदयस्थ परमात्माच होय. जो माझा भोळा भक्त असतो. त्याला कसलाच अहंकार नसल्याने तो वस्तुस्थिती सहजी स्वीकारतो आणि स्वतःला कर्ता न मानता सर्व कर्माचा कर्ता आत्मा आहे, हीच समजूत विश्वासाने दृढतर धरून बसतो. मग अन्नपानादि सेवन करताना आत्मारामच सर्वाचा भोक्ता आहे असे मानतो. अशा भोळय़ा भावाने भक्त जे माझे भजन करतो ते उत्तम असते. मी ते भजन मोठय़ा आवडीने ग्रहण करतो. सर्व भावाने सर्वतोपरी मुलाला जशी आई, त्याप्रमाणे माझ्या भोळय़ा भक्तांचे सर्वस्व मीच आहे. त्यांना अर्थ, स्वार्थ, परमार्थ, खरोखर सारे काय ते मीच असतो. भाविकांसाठी खरोखर मी सर्वस्व खर्च करतो. भोळय़ा भक्तांना माझ्या अनुसंधानाला लावतो. नाथबाबा म्हणतात सज्ञानाच्या तोंडातून काही वाकडे निघाले तर त्याच्या दोषाचे खापर त्याच्या मस्तकावर फुटते. पण भोळय़ा भाविक लोकांची कथा असंबद्ध असली तरी देवाला तिच्यापासून खरोखर संतोष होतो. पुढे भगवंत म्हणाले, सज्ञान्याना साधने करून करून दमल्यानंतर महत्प्रयासाने माझी प्राप्ती होते पण माझ्या भोळय़ा भक्तांना मी अनायासे उद्धरतो. पालखीचे भोई वाट चुकले तर त्यांना फेरा पडतो पण मूल बापाच्या कडेवरच बसलेले असल्याने आपोआपच मुक्कामी पोहोचते. त्याप्रमाणे साधनाने सज्ञानाच्या अंगाची झीज होते. भोळय़ा भक्ताचा उद्धार करणारा मी स्वतःच असल्यामुळे, त्याला मुळीच प्रयास पडत नाहीत. मी त्याला आपल्या खांद्यावरून वाहून नेऊन सायुज्यसिद्धीला पोचवतो. पण त्याची ती भोळी बुद्धि किती विलक्षण असते पहा ! तो तेथेही भजनविधि सोडत नाही. अंतःकरणांत कोणतेही कपट नसल्याने त्याचे भजन एकमार्गी चालू असते. त्यामुळे तो इकडे तिकडे न वळता थेट मलाच येऊन मिळतो. खरं सांगायचं तर भोळय़ा भक्ताला पाहून मीच त्याला सामोरा धावत जातो. मी त्याच्या भक्तीला सर्वतोपरी भाळलो असल्यामुळे रात्रंदिवस त्याच्यापाशीच असतो. निखालस जे भोळे भक्त असतात, ते भगवंताला आवडतात. हे ऐकून उद्धवाला अतिशय आनंद झाला. संत चोखा मेळा यांनी भगवंतांचं हे मनोगत अंतरज्ञानाने बरोबर जाणलं होतं. म्हणून ते म्हणतात, आम्हा ना कळे ज्ञान, ना कळे पुराण । वेदांचे वचन ना कळे आम्हा ।। चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझे ।।भगवंत पुढे म्हणाले, मला भोळे भक्त फार आवडतात. त्यांची गोडी काय सांगावी ? त्यांच्याशिवाय अर्धघटका राहण्यासाठी आवडत्या वस्तूंचे ढीगच्या ढीग दिले तरी मला ते नकोत. अशा प्रकारचे जे भोळे भक्त असतात, त्यांना मी उत्तम भागवत मानतो. मी प्रत्यक्ष भगवान असूनही त्यांच्या चरणी लागतो.
त्यांच्या भोळय़ा भक्तीचा मी भुकेला असतो. सदासर्वदा सावध राहून त्यांच्या शोधात असतो. त्यांच्यासाठी मी दशदिशांना धावत सुटतो. कारण, उद्धवा भोळा भक्त परम दुर्लभ आहे. म्हणून भोळा भक्त डोळय़ांनी पहाताच मीही त्याला हा हा म्हणता विकत घेऊन माझे पद त्याला देतो. बाकी मोलच करावयास गेले तर माझे भक्त हे माझ्यापेक्षा थोर आहेत. म्हणूनच मी त्यांच्या अंकित राहून भक्तांचे वचन कधी खोटे होऊन देत नाही.
वसुदेव-देवकीची शपथ घेऊन सांगतो की, शुद्ध चित्ताने केलेले भक्तीयुक्त भजन हेच मुख्य आहे. भक्तीशिवाय भजन खरोखर व्यर्थ होय. भाव असतो तेथे भाग्य असते कारण भाव असतो तेथे निःसंशय मी असतो. भाव असतो तेथे विरक्ति असते. भाव असतो तेथे शांति प्रकट होते. भाव असतो तेथे आत्मबोध होऊन भक्ति विकास पावते. अशा प्रकारे भाविकांमध्ये माझी भक्ति माझ्यासह स्वानंदाने नाचत असते. म्हणून भोळे आणि भावार्थी असतात तेच उत्तम भागवत होतात. अडाणी भक्त अशा रीतीने माझे भजन करून मला पावतात. आता उत्तम भक्ति कशी असते ते सांगतो.
क्रमशः