केंद्रीय मंत्री नकवी यांचे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन
करमाळा / प्रतिनिधी
बेळगाव येथून चेन्नई येथे हलविण्यात आलेले भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय पुन्हा मुंबईत सुरु करू मात्र त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी असे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिले. आज दिल्ली येथे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत ,शिवसेना सचिव खा. विनायक राऊत ,माजी केंद्रीय मंत्री खा. अरविंद सावंत ,खा. श्रीकांत शिंदे,करमाळा येथील रहिवासी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुक्तार अब्बास नक्वी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र कर्नाटक च्या सीमावर्ती भागातील अल्पसंख्यांक लोकांवर होणारे अन्याय व त्यावर उपाययोजना करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली व बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय केवळ राजकीय वादातून चेन्नई येथे हलविण्यात आले आहे. हे कार्यालय मुंबई येथे स्थापित करावे अशी मागणी केली. यावेळी मुक्तार नकवी यांनी बेळगाव चे कार्यालय थेट दक्षिणेतील चेन्नई येथे हलवणे अन्यायग्रस्त असल्याचे मान्य करून महाराष्ट्र शासनाने मुंबई जागा उपलब्ध करून दिल्यास आपण हे कार्यालयात तात्काळ मुंबईला परत आणू असे आश्वासन दिले.
या निर्णयानंतर बोलताना खा. संजय राऊत म्हणाले की बेळगावच्या सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या अनेक समस्या असून त्यांच्यावर कर्नाटक सरकारकडून दबावतंत्र वापरून अन्याय केला जातो. या सर्व बाबी आम्ही केंद्र सरकारच्या निदर्शनास आणले असून या सीमावर्ती भागातील मराठी माणसाच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभा राहील असे सांगितले. यावेळी बोलताना खा. अरविंद सावंत म्हणाले की यासंदर्भात आम्ही तात्काळ पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट घेऊन या भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयासाठी मुंबई येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ निर्णय घेणार असल्याचे सांगितले.