प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी मांडले विचार : आरपीडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय संमेलन
प्रतिनिधी /बेळगाव
जगभरात तंत्रज्ञानाची मोठी क्रांती झाली आहे. याचा परिणाम भाषेवरही झाला. भाषेमधून रोजगार निर्मितीकडे तरुणाईचा कल आहे. माध्यम, जाहिराती, अनुवाद, स्पर्धा परीक्षा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये तरुणांना संधी मिळत असल्याने साहित्यापेक्षा भाषिक कौशल्यावर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.
राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी ‘मराठी साहित्य व संस्कृती सुगंध’ या एक दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर, उपाध्यक्ष विनायक आजगावकर, महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाच्या उपाध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग, प्राचार्या शोभा नाईक, डॉ. आय. एम. गुरव, भुदरगड येथील कवी गोविंद पाटील उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, वाचनातून माणूस समृद्ध होत असतो. त्यामुळे ग्रंथ, पुस्तकांचे वाचन महत्त्वाचे आहे. साहित्य हे संवेदनशील मनाला घडवीत असते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असून त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यास मराठी नक्कीच अभिजात भाषा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
तिसऱया सत्रात कवी संमेलन झाले. तर चौथ्या सत्रात मराठी भाषा व संस्कृतीचे दर्शन घडविणारे पोवाडे, नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस असे कला प्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सोनाली पाटील हिने प्रार्थना सादर केली. प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी प्रास्ताविक केले. परसू गावडे यांनी परिचय करून दिला. यावेळी आरपीडीसह इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रंथदिंडीतून मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन
मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. किणये व उचवडे येथील वारकऱयांनी विठूभक्तीत तल्लीन होत अभंग सादर केले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये तरुण पिढीनेही सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात पारंपरिक वेषात ग्रंथदिंडी निघाली. विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या तरुणांनी लक्ष वेधून घेतले. भजनात दंग झालेल्या तरुणींना फुगडय़ा घालण्याचा मोह आवरला नाही.