प्रतिनिधी / कोल्हापूर
गंभीर स्वरुपाचे विविध 48 गुन्हे दाखल असलेल्या भास्कर टोळीतील पाच जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. अमोल महादेव भास्कर (वय 38), महादेव शामराव भास्कर (वय 61), अमित उर्फ पिंटु महादेव भास्कर (वय 33) शंकर शामराव भास्कर (वय 53), संकेत सुदेश व्हटकर (वय 22) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास जयसिंगपूरचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्याकडे हस्तांतरीत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. भास्कर टोळीने सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाचा जवाहरनगर येथील फ्लॅट बळकावण्याच्या उद्देशाने संबंधित ज्येष्ठ नागरिकाला जबरदस्तीने डांबून ठेवून स्टँम्पवर सही घेण्याचा प्रयत्न केला.
तसेच धारदार शस्त्राची भिती दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार टोळीतील पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास करत असताना टोळीवर विविध 48 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमारे यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार भास्कर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी प्रस्तावाची करुन प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर केला. पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी प्रस्तावाला पुर्वपरवानगी देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भास्कर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तक्रारदारांनी पुढे यावे
अमोल भास्कर व टोळीकडून खाजगी सावकारी, दहशतीच्या जोरावर भुखंड गिळंकृत करणे असे प्रकार घडल्याची शक्यता आहे. तरी भास्कर टोळीच्या अत्याचाराला, दहशतीला बळी पडलेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकडे यांनी केले आहे.