रस्तोरस्ती दिसणारे भिकारी ही भारताच्या महत्त्वाच्या समस्यांपैकी एक आहे. या भिकाऱ्यांना काम देऊन त्यांची भीक मागण्याची सवय बंद करणे हे खरे तर स्थानिक प्रशासनाचे काम असते. तथापि, याकडे सरसकट दुर्लक्ष केले जात असल्याने भिकाऱयांची संख्या वाढतच आहे. झारखंडमध्ये हजारीबाग येथे एका युवकाने भिकाऱयांचे भाग्य बदलण्याचा विडा उचलला आहे. भिकाऱयांना आत्मविश्वास ठेवून त्यांच्यात श्रम करण्याची प्रवृत्ती निर्माण करणे आणि या श्रमातून सन्मानाने आपली उपजिवीका करण्याची क्षमता त्यांना देणे हे जीवनध्येय म्हणून या युवकाने स्वीकारले आहे. तारकेश्वर सोनी असे त्याचे नाव आहे.
तारकेश्वर सोनी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी जोडले गेलेले आहेत. ते स्वतः योगप्रशिक्षक असून गेली 20 वर्षे विविध मार्गाने समाजसेवा करतात. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मनात भिकाऱयांचे भवितव्य बदलण्याच्या संकल्पनेने मूळ धरले. भिकाऱयांना केवळ काम देण्याने समस्या सुटणार नाही. त्यांच्या मनात भीक मागण्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला पाहिजे. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अशा प्रकारे परिवर्तन झाले पाहिजे की त्यांना भीक मागण्याची लाज वाटली पाहिजे, असा विचार त्यांनी केला. त्यानुसार अनेक मंदिरांसमोरील भिकाऱयांशी त्यांनी संवाद साधला. त्यांना स्वतःच्या खर्चाने चांगले आणि स्वच्छ कपडे घालावयास दिले. वेशभूषा बदलल्यामुळे भिकाऱयांना भीक मागण्याविषयी कमीपणाची भावना निर्माण झाली. जो भिकारी रोज सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालेल, त्याला भोजन देण्यात येईल, अशी योजना त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर कपडे, साबण, तेल इत्यादी वस्तूही देण्याची सोय केली. याचा परिणाम म्हणून आज अनेक भिकाऱयांनी भीक मागणे हा व्यवसाय सोडून दिला असून ते कष्ट करून आपली उपजिविका करतात. आता त्यांना भीक मागण्याबद्दल घृणा उत्पन्न झाली आहे.