प्रतिनिधी / सांगली
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. जर आंबेडकर यांना शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे हे गुन्हेगार आहेत असं वाटत असेल तर मग त्यांनी न्यायालयात त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही? याचा त्यांनी प्रथम खुलासा करावा. त्यांनी या विरोधात कोणताही उल्लेख केला नाही. याचा अर्थच आंबेडकर यांनी भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत. असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भीमा-कोरेगावशी माझा यापूर्वी कधीही संबंध आला नाही. आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी करावी अशी मागणी यापूर्वीच केली होती. त्यामुळे ज्यांनी दंगल भरून षड्यंत्र केलं त्या सर्वांना प्रायश्चित्त आणि शासन व्हावं हीच आमची प्रमुख मागणी आहे. मग यात संभाजी भिडे, एकबोटे किंवा इतर कोणीही असतील तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या वेळी जी चौकशी झाली त्या चौकशीने राज्यातील जनता समाधानी नाही. शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यानंतर खडबडून जागे होऊन काहीतरी वेगळा विचार डोक्यात ठेवून केंद्र सरकारने आता भीमा-कोरेगाव संदर्भात एनआयएकडून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एसआयटी नेमून या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी करणं गरजेचं आहे असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.