वार्ताहर / भिलवडी
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास भिलवडी व परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. या वादळी वाऱ्यामध्ये अनेकांची घरे पडली.अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याच बरोबर मुख्य रस्त्यालगत असतानी मोठमोठी झाडे देखील पडली. काही झाडेही विद्युत वाहक तारेवर पडल्या कारणाने, बऱ्याच ठिकाणच्या विद्युत वाहिका तुटल्या तर काही ठिकाणचे विद्युत पोल देखील वाकले होते त्यामुळे भिलवडी आणि परिसरातील विद्युत पुरवठा शनिवारी दुपारी पासून खंडित करण्यात आला होता यानंतर विद्युत कर्मचाऱ्यांनी भिलवडी येथील सहाय्यक अभियंता गोविंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेऊन रात्रीच्या अंधारामध्ये देखील अविरतपणे काम करून,शनिवारी मध्यरात्री बऱ्याच ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात करून भिलवडी आणि परिसरातील असणाऱ्या गावठाण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. दत्तनगर भिलवडी येथे देखील झाडे पडून विद्युत तारा तुटल्या होत्या. दत्तनगर येथील ग्रामस्थांनी स्वतः विद्युत वाहक तारा जवळील झाडे तोडून, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. त्यामुळे दोन दिवस लाईट नसल्याने अस्वस्थ झालेल्या दत्तनगर येथील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. सध्या गावठाण भागातील लोक वस्तीतील जवळजवळ सर्व ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला असून, शेतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून तुटल्या असल्याकारणाने त्याचे काम अद्याप बाकी आहे. लवकरच तेही काम पूर्ण करण्यात येईल असा विश्वास सहाय्यक अभियंता गोविंद परांजपे यांनी व्यक्त केला.