‘त्या’ 10 आमदारांना मुख्यमंत्र्यांकडून धीर
प्रतिनिधी/ पणजी
अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या सत्ताधारी भाजपच्या 10 आमदारांची बैठक बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर आल्तीनो येथे झाली आणि संभाव्य परिस्थिती कशी हाताळावी या विवंचनेत असलेल्या या बलाढय़ नेत्यांना मुख्यमंत्र्यांनीच धीर दिला.
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन दहाही आमदार (त्यातील अनेकजण मंत्री आहेत) व सभापतींनाही नोटीस जारी केली आहे. या विषयावरील सुनावणी जुलैच्या पहिल्या आठवडय़ात होऊ शकते. तथापि, दहाही आमदारांनी दावा केला की त्यांना नोटीस मिळालेली नाही. सभापती राजेश पाटणेकर यांनी तर आपल्याला अद्याप नोटीस मिळालेली नाही, असेच म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने अपात्रता प्रकरणी मणीपूर विधानसभा अध्यक्षांना दिलेली नोटीस, तसेच एका मंत्र्याचे काढून घेतलेले अधिकार व आमदारांचेही काढून घेतलेले अधिकार यामुळे भाजपमध्ये गेलेले 10 काँग्रेस बंडखोर नेते सध्या भयभीत झालेले आहेत व अनेकांची झोपच उडालेली आहे. न्यायालयाने अपात्र केले तर काय करायचे? या विषयावर मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो निवासस्थानी बैठक झाली. राज्याचे ऍडव्होकेट जनरल पांगम हेही यावेळी उपस्थित होते.
सारे काही ठिक होईल : कवळेकर
बैठकीतून बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही जे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये गेलो ती सर्व प्रक्रिया कायदेशीर होती. प्रसारमाध्यमांकडून यावर बरीच चर्चा झालेली असल्याने प्रत्येकाच्या मनात धाकधूक नको म्हणून आम्ही सायंकाळी चर्चेला बसलो. मुख्यमंत्र्यांनी देखील चर्चेत भाग घेतला. मात्र कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. सारे काही ठिक होईल. आम्ही कायद्याचे उल्लंघन केलेले नाहीच, असे ते म्हणाले.
या बैठकीस 10 जण उपस्थित होते. मात्र मगोतून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेले बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर हे दोन मंत्री उपस्थित नव्हते. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्याने व याचिका दाखल करून घेतल्याने सर्व दहाही आमदारांसह या सरकारलाही फार मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळेच आढावा घेऊन हे प्रकरण न्यायालयात कसे लढवावे व प्रख्यात कायदेतज्ञचीही मदत घेण्याचे ठरले.