प्रतिनिधी/ चिपळूण
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीक मांगो आंदोलनाला नागरिक, व्यापाऱयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातून हजारो रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 20 डिसेंबर रोजीही हे आंदोलन केले जाणार असून मूकमोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे.
महापुराला कारणीभूत असलेल्या शिवनदी व वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने गेल्या 14 दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आतापर्यंत अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे नेते आदींनी भेटी दिल्या आहेत. शासनस्तरावर बैठकाही झाल्या आहेत. मात्र तरीही समितीला अपेक्षित असलेला निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे साखळी उपोषणाची दिशा आता थोडी बदलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याने शहर परिसरातील नागरिकांकडून एक रूपया मागत चिपळूण बचाव समितीने शनिवारपासून भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे.
गाळ काढण्यासाठी 160 कोटी रूपयांची गरज असताना शासनाने 9.56 लाख दिले आहेत. मात्र मंत्रालयस्तरावर बैठका होऊनही व जादा निधीची गरज असूनही निधीची तरतूद केली जात नसल्याने एक रूपया भिक मागून जमा झालेले पैसे हे शासनाला गाळ काढण्यासाठी देण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे रविवारी पदाधिकाऱयांनी कॉईन बॉक्स हातात घेऊन आंदोलनाला सुरूवात केली. शहरभर झालेल्या या आंदोलनावेळी नागरिक, व्यापारी, दिव्यांग, भाजीवाले, रिक्षाचालक आदींनी एक-एक रूपया टाकत हे आंदोलन यशस्वी केले. गेल्या 2 दिवसात यातून हजारो रूपये जमा झाले आहेत. 20 रोजीही येथे हे आंदोलन केले जाणार आहे.
आज मूकमोर्चाचे आयोजन
उपोषणकर्त्याचे बळ आणखी वाढावे, प्रशासकीय यंत्रणेला जाग यावी, यासाठी 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासनाच्या विरोधात निषेध मूकमोर्चा काढला जाणार आहे. वाशिष्ठी पुलापासून सुरू होणारा हा मोर्चा बाजारपेठमार्गे प्रांत कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. या मोर्चाला खेर्डीतील ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला असून ते बहादूरशेखमार्गे प्रांत कार्यालयाजवळ येणार आहेत.
बुधवारी बाजारपेठ बंद
या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून 22 डिसेंबर रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. आंदोलन तीव्र करूनही शासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.