यादवांना लग्नमंडपाकडे चलण्याची सूचना दिली गेली. कृष्णाला वंदन करून शुद्धमती लग्नमंडपी आली. कृष्णाच्या भोजनाचा शेष घेऊन तिने रुक्मिणीला दिला.
कृष्णप्रसाद धरिला माथां । भीमकी झाली रोमांचिता । चित्त विसरलें सावधानता । कृष्णशेषें ।
जंव जंव कृष्णशेष सेवी । तंव तंव समाधिसुखा वांकुल्या दावी । बाप भाग्याची पदवी । स्वर्गी देवीं वानिजे । कृष्णमुद्रा हृदयीं धरी । अभिवंदूनियां शिरिं।
मग घातली कराग्रीं । लोण उतरी शुद्धमती ।
रुक्मिणीने तो प्रसाद हातात घेतला व तिच्या सर्व अंगावर रोमांच फुलले. कृष्णशेष खाल्यावर तिला समाधी सुखापेक्षा अधिक आनंद प्राप्त झाला. तिने कृष्णाची अंगठी हृदयी धरली, मस्तकाला लावली व मग ती बोटात घातली. शुद्धमतीने तिची दृष्ट काढली.
चढोनि परिचियें उपरी । सद्गुरु सावधान करी ।
घटिका प्रति÷िली अंतरिं । जीवनावरी सखेच्या ।
घडी जेंगटातें हाणत । जेंगट तेणें नादे गर्जत ।
काळ गेला रे गेला म्हणत । वेळ व्यर्थ जाऊं नेदी ।
अक्षर निमिष पळेंपळ । घटिका भरतां न लगे वेळ ।
लोक व्यापारें बरळ । गेला काळ नेणती ।
सद्गुरु सांगे भरली घडी । उगेंचि पाहाती वऱहाडी ।
ज्यासी निजकार्याची तातडी । ते घडिया घडी साधिती ।
आळसी लोक निद्रापार । निजमंडपी कृष्ण सादर ।
विस्तारवी फलसंभार । नानाप्रकार मेचूचे ।
शून्य सांडूनि विरजांबर । चिद्रत्नाचे अलंकार ।
पदकी नीळ मनोहर । जो शृंगार ह्रदयीचा ।
अहंकाराचें बीज भरडी । मोहममतेचा कोंडा काढी। सोलींव डाळींचीं परवडी । भरली दुरडी श्रद्धेची।
विवेकचाळणियां चाळिली । कणीक आणिली तेजाळी । निवडूनि स्वानंदाची नव्हाळी । ठेविली गुळी निजगोडी । देठीहूनि सुटलीं फळें । अत्यंत परिपाकें निर्मळें । मधमधीत सुपरिमळें । सूफळ फळें रुक्मिणी।
अत्यंत पढिये भीमकबाळा । गुणेंवीण सुमनमाळा। अंगें गुंफी घनसांवळा । हार गळा आणि जाळी । सौभाग्यद्रव्यें ठेविली आधीं। धनींपणें धणे हळदी। जिरें मेळविलें त्यामधीं । जेवीं सद्बुद्धि विवेक । गांठी सांडिल्या सोडोनि । घेतला सूक्ष्म तंतू काढोनी ।
श्रीकृष्ण वोवी कृष्णमणी । ते रुक्मिणी गळसरी ।
सांडोनि कठिणत्वाचें बंड । केवळ रसाचे प्रचंड ।
कृष्णें कृष्णवर्ण इक्षुदंड । अति उदंड आणिले ।
बीजेंवीण वाढलीं फळें । एक त्वचेवीण रसाळें ।
चमत्काराचीं निर्मळें । कृष्ण फळें विस्तारी ।
उंच जागी उभे राहून सुदेव ब्राह्मणाने थाळय़ावर टोल वाजवून लग्नाची वेळ जवळ आल्याची सूचना केली. तो घंटानाद सर्वत्र पसरला. सुदेव म्हणाला-सावधान! काळ गेला रे गेला! वेळ फुकट जाऊ देऊ नका. क्षणाक्षणाला वेळ पुढे सरकत आहे. घटिका पळे भरत चालली आहे. उगीच बडबडीत वेळ वाया जातो. ज्यांना कामाचे महत्त्व कळते ते वेळ पाळतात व साधतात.
Ad. देवदत्त परुळेकर