अठरा महिन्यात प्रकल्प होणार होता पूर्ण
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात मागच्या सुमारे आठ वर्षापूर्वी जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील सगळय़ा रस्त्यांची वाट लागली होती. त्यानंतर 2017 पासून महत्वकांक्षी अशा भुयारी गटर योजनेचे काम सुरु झाले. हे काम अठरा महिन्यात पूर्ण कारयचे होते. परंतु तब्बल दुप्पट कालावधी होवून गेला तरीही हे काम अद्यापही रडतखडत सुरु आहे. मुळात सेवेज प्लॅण्टच्या जागेचा तिढाच अजून सुटलेला नाही. नुसत्याच जमिनीत पाईपा गाढल्या गेल्या आहेत. काही ठिकाणचे तर अजूनही काम बाकी आहे. हा प्रकल्प मात्र 50 कोटी 30 लाखांचा आहे.
सातारा शहरातले गटर भुयारातून जाणार होते. त्या योजनेला दि. 25सप्टेंबर 2017 ला राज्य शासनाने मंजूरी दिली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून ही योजना करण्यास राज्य शासनाने त्यावेळी मंजूरी दिली होती. त्या कामासाठी नुसता सर्व्हेच 50 लाखांचा करण्यात आला. सेवेज कलेक्शन सिस्टिम झोन 3साठी 23 कोटी 2 लाख 37 हजार600 रुपये खर्च प्रस्तावित होता. तर सेवेज पंपिंग स्टेशनसाठी 31 लाख 83 हजार 400 रुपये खर्च येणार होता. मेकॅनिकल वर्क 2 साठी 1 कोटी 46 लाख 91 हजार 500 रुपये खर्च होणार होते. रानमळा येथील नाल्यासाठी 84 लाख 23 हजार 877 रुपये खर्च होणार होता. बेघर होम येथील नाल्यासाठी 72 लाख 2 हजार 82 रुपये प्रस्तावित खर्च होता. मुख्य लाईनासाठी 6 कोटी 89 लाख34हजार 600 रुपये खर्च येणार होता. सेवेज पंपिंग स्टेशन मिलिंद हौसिंग सोसायटीमधील कामासाठी 58 लाख 55 हजार 400 रुपये तर त्याच्या मॅकेनिकल वर्कसाठी 2 कोटी 81 लाख 11 हजार रुपये, तर सेवेज ट्रीटमेंट प्लॅन्टसाठी 10 कोटी 64 लाख 60 हजार 400 रुपये असा एकूण 50 कोटी 30 लाखाचा हा प्रकल्प आहे. तो 18 महिन्यात पूर्ण करण्यात येणार होता. त्यासाठी केंद्र शासन 25 कोटी 15 लाख अनुदान देणार होते तर राज्य शासनाकडून 12 कोटी 7 लाख आणि सातारा नगरपालिका 12 कोटी 8 लाख खर्च करणार होती. मात्र, बेगर होमपर्यंत दोन वर्षापूर्वी खुदाई करण्यात आली. परंतु गटराच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्लॅन्टला तेथे नंतर जागाच मिळाली नाही. त्यामुळे पुढचे पाठ अन् मागचे सपाट अशीच गत या योजनेची झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. सध्या मंगळवार पेठेत खोदाखोदी सुरु आहे. आधी पायाच नाही तर इमारतीचा कळस घातला जात आहे. त्यामुळे या योजनेवर विरोधक असलेल्या नगरविकास आघाडीने तर कित्येक वेळा सभागृहात आपला आवाज उठवला परंतु काहीच फरक पडला नाही. येरे माझ्या मागल्याप्रमाणे नियोजनाच्या अभावामुळे रस्त्याची खोदाखोदी सुरु असून नागरिकांच्या पाण्याचे पाईप तोडण्याचे काम चांगले सुरु आहे. प्रत्यक्षात भुयारी गटर योजनेमध्ये वापरलेले पाईप चांगल्या दर्जाची आहे का?, जेसीबीने खोदलेले रस्ते, रस्त्याच्या मधोमधच काढलेले चेंबर सगळाच गोंधळात टाकणारी योजना असल्याची चर्चा सुरु आहे.
सेवेज प्लॅन्टचे नेमके काय झाले?
त्यावेळी भुयारी गटरचे नारळ फुटले. महत्वकांक्षी योजना म्हणून डंकाही पिटला गेला. परंतु पुढे जेव्हा प्रस्तावित सेवेज जागेचे गमक पुढे आले तेव्हा मात्र काम तेथील रेंगाळले. तेथील नागरिकांनीही जोरदार विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामुळे सेवेज प्लॅन्टचा पत्ताच नाही. त्या प्लॅन्टला नव्याने कोठे जागा मिळणार यासाठीही पालिकेचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.