मालवण येथे ऍड. स्वरुप पई यांचे प्रतिपादन
जागतिक जल दिन कार्यक्रम
तालुका विधी सेवा समिती-वकील संघटनेचे आयोजन
वार्ताहर / मालवण:
कोकणात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असला, तरी पावसाचे पाणी शोषून घेण्याची येथील जमिनीची क्षमता कमी आहे. रेन हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे पावसाचे पाणी बोअरवेलद्वारे जमिनीत सोडणे गरजेचे आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवण तालुका विधी सेवा समितीचे ऍड. स्वरुप पई यांनी येथील भंडारी हायस्कूल येथे केले.
मालवण तालुका विधी सेवा समिती आणि मालवण तालुका वकील संघटना यांच्यातर्फे मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. ऍड. अक्षय सामंत, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, मालवण न्यायालयाचे लिपीक संदीप परब आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक खोत यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. गोडय़ा म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण मोजके आहे. त्याचा जपून वापर करणे आणि त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे खोत यांनी सांगितले.
ऍड. पई म्हणाले, कोकणात पडणाऱया पावसाचे पाणी वाहून जाते. गोडय़ा पाण्याचे स्रोत कमी होत असताना पाऊस हा गोडय़ा पाण्याचा मोठा स्रोत आहे. मात्र, पावसाचे पाणी साठविण्याच्या नियोजनाची आपल्याकडे कमतरता आहे. पाण्याचा वापर जपून करण्याबरोबरच पाणी साठवून पाण्याचे स्रोत निर्माण करणेही गरजेचे आहे. पावसाचे पाणी भूगर्भात साठविल्यास त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो.
ऍड. सामंत म्हणाले, भविष्यातील युद्ध हे पाण्यासाठी होईल. आपण पाण्याचा बेतालपणे वापर करत असतो. आपण मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया घालवतो. भविष्यातील जीवन जगण्यासाठी पाणी वाचविणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी कसे साठवता येईल, पावसाच्या पाण्याचा कसा वापर करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. न्यायालयाचे कर्मचारी शरद बामणे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम झाला.