भारतासोबत शांततेचा सूर आळवतोय पाकिस्तान
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
भारत आणि पाकिस्तानसाठी ही ‘भूतकाळ विसरण्याची आणि पुढे जाण्याची’ वेळ असल्याचे उद्गार पाकिस्तानचे सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी गुरुवारी काढले आहेत. दोन्ही शेजारी देशांदरम्यान शांतता राहिल्यास दक्षिण आणि मध्य आशियात विकासाच्या संधींना ‘खुल्या’ करण्यास मदत मिळणार असल्याचे बाजवा यांनी इस्लामाबाद सुरक्षा चर्चासत्राला संबोधित करताना म्हटले आहे.
विवादांमुळे क्षेत्रीय शांतता आणि विकासाच्या शक्यता न सुटलेल्या मुद्दय़ांमुळे नेहमीच ओलीस राहिली असल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानसोबत दहशतवाद, वैर आणि हिंसाचारमुक्त वातावरणासह सामान्य स्वरुपातील शेजाऱयांशी संबंधांची आकांक्षा करत आहोत. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तानची असल्याचे भारताने नमूद केले होते.
आमच्या शेजारी देशाला विशेष स्वरुपात काश्मीरमध्ये एक अनुकूल वातावरण तयार करावे लागणार आहे. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा काश्मीरचा आहे. शांततापूर्ण मार्गांच्या माध्यमातून काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय या क्षेत्रात शांततेसाठीचा कुठलाच पुढाकार यशस्वी होऊ शकत नसल्याचे जनरल बाजवा म्हणाले. क्षेत्रीय तणावामुळे नुकसान होते. आम्ही संरक्षणावर गरजेपेक्षा अधिक खर्च करू लागतो आणि याचा आमच्यावरच प्रभाव पडतो असे म्हणत बाजवा यांनी याला देशाच्या गरिबीशी जोडले आहे.
पूर्व आणि पश्चिम आशियादरम्यान संपर्क निश्चित करून ‘दक्षिण आणि मध्य आशियाच्या क्षमतेत भर टाकण्यासाठी’ भारत तसेच पाकिस्तान यांच्यात शांततेचे वातावरण असणे अत्यंत आवश्यक असल्याचे बाजवा यांनी सांगितले आहे. बाजवा यांच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी पंतप्रधान इम्रान खान यांनी याच ठिकाणी अशाचप्रकारचे विधान केले होते. पाकिस्तानसोबत शांतता राखल्यास भारताला आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच पाकिस्तानच्या भूभागाच्या मार्गे साधनसंपत्तीने समृद्ध मध्य आशियात थेट पोहोचण्यास मदत मिळणार आहे. भारताला याकरिता पहिले पाऊल उचलावे लागणार आहे. भारताने हा पुढाकार न घेतल्यास आम्हाला अधिक काही करता येणार नसल्याचे इम्रान यांनी म्हटले होते.