रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पुढे म्हणते –
हे कमलनयना ! आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली, तरी आपल्या चरणकमलांवर माझे दृढ प्रेम असावे. जेव्हा आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता, तोसुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे, असे मी मानते.
स्वामे बोलिले जियेपरी । लटकी नोहे ते वैखरी। कन्या असतां जनका घरिं । भूपा अंतरिं कामिती।अंबा अंबिका अंबालिका । तिघी काशीस्वराच्या कन्यका। त्यांमाजी शाल्वाच्या अभिलाखा । अंबा करिती जाहले ।तिये अंबेचिये परी। कन्या असंस्कृता जनकाघरिं । वर वांछी ते स्वयंवरिं । अभ्यंतरिं अनुरूप। क्वचित कोठें कोठें ऐसी । कन्या असंस्कृता जनकाघरिं । वर वांछी ते स्वयंवरिं । अभ्यंतरिं अनुरूप।भगवद्वचना देऊनि मान । इतुकें केलें उपपादन । याहूनि कांहीं बोलिली आन । तें सर्वज्ञ परिस तूं ।
रुक्मिणी म्हणते-हे मधुसूदना ! एखाद्या अनुरूप वराला माळ घाल, असे आपण म्हणालात. तुमचे हे म्हणणे मला खोटे वाटत नाही. कारण कधी कधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशिराजाची कन्या अंबा हिच्याप्रमाणे एखादीचे दुसऱया पुरुषावर प्रेम असू शकते. या अंबेची कथा महाभारतात आली आहे. तिचा सारांश असा – काशीनरेशच्या तीन मुली म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका. पैकी मोठय़ा अंबेचे प्रेम सुबलराज शाल्व याच्यावर होते. तिने त्याला वचन दिले होते की मी स्वयंवरात तुझ्याच गळय़ात वरमाला घालेन. पण महाप्रतापी भीष्म तिथे पोचला आणि त्याने सगळय़ांचा पाडाव करून तिन्ही पोरी रथात घालून हस्तिनापुरी आणल्या. हस्तिनापुरात पोचल्यावर अंबेने भीष्माला सांगितले की तिचे शाल्वावर प्रेम आहे, तिने त्याला मनाने पती मानले आहे, म्हणून भीष्माने तिला जाऊ द्यावे. भीष्माने तिला ‘सुबल’राज्यात पोचवण्याची व्यवस्था केली. तिथे गेल्यावर शाल्व म्हणाला, तुला भीष्माने जिंकले आहे. शिवाय मधले काही दिवस तू त्याच्याबरोबर होतीस, त्यामुळे मी तुझा स्वीकार करणार नाही. अंबा तिथून निघाली आणि पुन्हा हस्तिनापूरला आली. तिने भीष्माला सांगितले की तू माझ्याशी लग्न कर, मला तू जिंकून आणले आहेस. पण भीष्माने ‘आमरण ब्रम्हचारी’ राहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याने तिला नकार दिला आणि अंबेचे दुर्दैव सुरू झाले. ‘मी तुझ्या मृत्यूला कारण होईन,’ असे भीष्माला सांगून ती हस्तिनापुरातून बाहेर पडली.
अंबा त्यानंतर आर्यावर्तातल्या प्रत्येक राजाकडे गेली. पण तिला सगळय़ांनी बाहेरचा रस्ता दाखवला. खुद्द तिच्या माहेरच्या लोकांनीही, ‘तू आमच्यासाठी मेलीस,’ छापाची भूमिका घेतली. अंबेची कथा ऐकून परशुरामाने भीष्माला धडा शिकवण्याचे ठरवले, पण एकवीस दिवस युद्ध करूनही तो भीष्माला मारू शकला नाही कारण भीष्माला ‘इच्छामृत्यू’चे वरदान होते. त्यानंतर अंबा अन्न-पाण्याचा त्याग करून तपश्चर्येला बसली. शिवाकडून भीष्म वधाचे वरदान प्राप्त करून घेऊन तिने देहत्याग केला. याच अंबेने पुढचा जन्म ‘शिखंडी’चा घेतला आणि त्याला समोर ठेऊन अर्जुनाने भीष्मावर शरसंधान केले! Ad. देवदत्त परुळेकर