कोणे एके काळी मराठीत एखादं फार चांगलं किंवा फार वाईट पुस्तक प्रकाशित झालं की त्यावर मान्यवर ज्ये÷ लेखक-समीक्षक-संपादक वगैरे मंडळी आपणहून अभिप्राय देत. आचार्य अत्र्यांना एखादं पुस्तक आवडलं तर ते चक्क त्यावर अग्रलेख लिहीत. बाबा कदम यांच्या पहिल्या कादंबरीवर अत्र्यांनी कौतुकाने अग्रलेख लिहिल्याची हकिकत वाचली आहे. अशा स्तुतीमुळे लेखकाला आयता वाचक वर्ग लाभतो. पुल देखील त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर आवर्जून रसग्रहणपर लिहीत.
आचार्य अत्र्यांना एखादं पुस्तक वाचून राग आला तर त्याही प्रसंगी ते अग्रलेख लिहून राग व्यक्त करीत. अशा वेळी त्या पुस्तकाची लोकप्रियता कमी व्हायला हवी. पण एखादी गोष्ट वाईट आहे, ती करू नकोस असं कोणी सांगितलं की ती करून बघण्याकडे माणसाचा कल असतो. त्यामुळे अत्र्यांनी रागाने अग्रलेख लिहिलेल्या पुस्तकांना देखील वाचक लाभत असत.
पुस्तकांवर विविध नियतकालिकात, वर्तमानपत्रात परीक्षणे आलेली आपण बघतो. प्रत्येक पुस्तकाला अशा परीक्षणांचा उपयोग होतो की नाही हे समजायला मार्ग नाही. पण निदान ती पुस्तके वाचकांना आणि ग्रंथालयांना निदान ठाऊक तरी होतातच. मात्र अमुक एका समीक्षकांनी स्तुती केल्यावर पुस्तक लगेच हिट किंवा बेस्ट सेलर होते का आणि समीक्षकांनी प्रतिकूल शेरा दिल्यामुळे एखादे पुस्तक मार खाते का हा संशोधनाचा विषय ठरावा.
जी गोष्ट पुस्तकांची, तीच नाटकांची आणि चित्रपटांची. आता या क्षेत्रात आणखीन एक मजेदार घटक अवतरला आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडियावरचे जनमानस सरकारधार्जिणे आणि सरकारविरोधी अशा दोन कट्टर गटात विभागले गेले आहे. कोणत्याही कलाकाराने एका पक्षाच्या बाजूने भूमिका घेतली की विरोधी गटातले लोक त्याच्या नाटकांवर-सिनेमांवर बहिष्कार जाहीर करतात. त्याला शिवीगाळ, ट्रोलिंग देखील करतात. त्याअर्थी निदान सध्या तरी चित्रपट कलावंतांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य उरलेले नाही असे म्हणावेसे वाटते. तूर्तास दीपिका नावाची अभिनेत्री, तिने जेएनयू विद्यापीठात घेतलेली भूमिका यावरून सोशल मीडियावर वादावादी चालू आहे. मला त्याबद्दल एकच शंका आहे.
समजा एखाद्या चित्रपटातल्या एकाने एक आणि दुसऱयाने विरुद्ध भूमिका घेतली तर सोशल मीडियावरचे उत्साही वीर काय बरे करतील?