सावंतवाडी/प्रतिनिधी-
रत्नागिरी येथे पार पडलेल्या ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत क्षितिज इव्हेंटच्या संगीत मत्स्यगंधा नाटकाने दोन रौप्यपदकांसह उत्कृष्ट संगीत साथीच्या पारितोषिकाची कमाई केली आहे. अनपेक्षित घडलेल्या घटनेनंतरही माझ्या टीमच्या सर्व कलाकारांनी प्रसंगावधान दाखवत प्रयोग यशस्वी केला. नाटकात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. नवख्या कलाकारासोबत स्पर्धेत अचानकपणे भूमिका साकारण्याचे कौशल्य टीममधील कलाकारांनी दाखवले. कलाकारांची भूमिकेसाठीची मेहनत आणि रंगभूमीवरील श्रद्धेमुळेच यश संपादन झाल्याचे मत नाटकाचे दिग्दर्शक आणि नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणारे बाळ पुराणिक यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.