प्रतिनिधी / सातारा :
अतिवृष्टीने व भूस्खलनाने बाधित झालेल्या गावांचे भूगर्भ तज्ज्ञांच्या समितीमार्फत सर्वेक्षण करून त्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे व बाधित कुटुंबांना तातडीनं तात्पुरती निवार शेड ऊभी करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील तारळे विभागातील अतिवृष्टीने बाधित गायमुखवाडी(बांबावडे), कळंबे, डफळवाडी,केंजळवाडी, बागलेवाडी, जळव गावांचीपाहणी व स्थलांतरीत नागरिकांच्याभेटी प्रसंगी ते बोलत होते.
देसाई म्हणाले, पुनर्वसन करावयाच्या गावांची माहिती घेऊन पुनर्वसन करण्यासाठी व निवारा शेड उभी करण्यासाठी शासकीय जमीन आहे का ? नसेल तर नागरिकांनी बसून चर्चा करावी व मालकी हक्कातील जमीन कशी उपलब्ध करता येईल हे पाहावे. तसेच भूस्खलन झालेल्या शेत जमीनीचे जागेवर जाऊन पंचनामे करून ती जमीन शेतीलायक करण्यासाठी काय करावं लागेल त्यांचा चार दिवसात अहवाल प्रांतांकडे पाठवण्याचे व राहिलेले घरांचे, शेतीचे, खाजगी विहीरचे, शासकीय मालमत्तेचे पंचनामे दोनचं दिवसात पुर्ण करण्याचे आदेश संबंधीत विभागांना दिले.