कायमचा बंदोबस्त करा; जनतेची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
जागा खरेदी करून घरे बांधून 30 वर्षांपासून राहात आहोत. काही जणांनी प्लॉट घेतल्यानंतर त्या ठिकाणी शेडही उभारली आहेत. याच्या रितसर सर्व नोंदी आहेत. असे असताना भू-माफियांचे काही एजंट पिरनवाडी येथील विनायकनगर येथे दहशत माजवत आहेत. तेक्हा त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी विनायकनगर येथील कुटुंबीयांनी लहान मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनाद्वारे केली आहे.
विनायकनगर येथे मूळ मालकाने 1995 मध्ये जागा विक्री केली आहे. काहींनी ती रितसर खरेदी केली आहे. जवळपास 265 प्लॉट विक्री करण्यात आले आहेत. त्यांची ग्राम पंचायतमध्ये नोंद करून विक्री करण्यात आली आहे. असे असताना खोटी कागदपत्रे तयार करून खटला दाखल करण्यात आला. तो खटला रहिवाशांच्या बाजूनेच निकाली झाला आहे. असे असताना अचानकपणे येऊन शेड पाडणे, दहशत माजविणे असे प्रकार सुरू केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रमेश तळवार, विजय तळवार यांच्यासह पिरनवाडीचे काही माजी ग्रा. पं. सदस्य यात सामील असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तातडीने या एजंटांचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी येथील प्लॉटधारक रहिवाशांनी केली आहे. यावेळी मनोज बाळेकुंद्री, शोभा मणगुत्ती, मारुती कुंडेकर, विश्वनाथ पाटील, शिवाजी सायनेकर, वाय. एन. पाटील, दुद्दाप्पा कुगजी, एस. एन. पाटील, गोरे, कुंभार यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.