प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथील पिकावू जमिनीचे संपादन करून रहिवासी वसाहत निर्माण करण्याचा घाट बुडा प्रशासनाने घातला आहे. सदर जागेत 50:50 या तत्त्वावर योजना राबविण्यासाठी जागा देण्याची नोटीस शेतकऱयांना बजावली आहे. मात्र, या भू-संपादनास अनगोळवासियांनी तीव्र विरोध केला असून, आतापर्यंत बुडाकडे दीडशेहून अधिक शेतकऱयांनी आक्षेप नोंदविला आहे.
शहराच्या सभोवती असलेल्या पिकावू शेतजमिनी संपादित करून रहिवासी वसाहत निर्माण करण्याचा सपाटा बुडाने चालविला आहे. अनगोळसह विविध परिसरातील जमिनी संपादित करण्यासाठी बुडा प्रशासनाने यापूर्वीही प्रयत्न चालविला होता. मात्र शेतकऱयांनी विरोध करून बुडाचा प्रयत्न हाणून पाडला होता. आता पुन्हा एकदा 50:50 या तत्त्वावर योजना राबविण्यासाठी आटापिटा चालविला आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात अनगोळ येथील शेतकऱयांना नोटीस बजावून योजना राबविण्यासाठी जमिनी देण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र शेतकऱयांनी याला विरोध दर्शविला आहे. कोणत्याही स्थितीत आम्ही जमिनी देणार नाही. आमच्या जमिनीमध्ये कोणतीही वसाहत योजना नको, अशी भूमिका शेतकऱयांनी घेतली आहे.
कणबर्गी परिसरात 50:50 या तत्त्वावर योजना राबविण्यासाठी शेतकऱयांकडून संमतीपत्र घेऊन 125 एकर शेतजमिनीवर ताबा मिळविला आहे. पण 14 वर्षांनंतरही अद्याप योजना मार्गी लागली नाही. ही योजना अर्धवट स्थितीत असताना अनगोळ परिसरातील 157 एकर शेतजमिनीवर बुडाने डोळा ठेवला आहे. पण पिकावू जमिनी देण्यास अनगोळवासियांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. भू-संपादन प्रक्रिया रद्द करावी याकरिता जिल्हाधिकारी आणि बुडा कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे. येथील 150 हून अधिक शेतकऱयांनी वैयक्तिकरीत्या बुडाकडे आक्षेप नोंदविला आहे. या शेतजमिनीवरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असल्याने रहिवासी वसाहतीसाठी शेतजमीन देणार नसल्याचे म्हणणे बुडाकडे नोंदविले आहे. त्यामुळे बुडाच्या बैठकीत आक्षेपाबाबत चर्चा होण्याची शक्मयता आहे. या भू-संपादनाबाबत बुडा कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.