कणबर्गी येथील शेतकऱयाची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या सातबारा उताऱयावर बुडाने आपले नाव दाखल केले आहे. याची धास्ती घेतल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कणबर्गी येथील पिकाऊ शेतजमिनीमध्ये वसाहत योजना राबविण्यासाठी बुडाने भू-संपादन केले आहे. भू-संपादनाच्या धास्तीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. तर काहींचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वरनगर कणबर्गी येथील मल्लव्वा लक्ष्मण मालाई असे त्या महिलेचे नाव आहे.
योजना क्रमांक 61 राबविण्यासाठी बुडाने 165 एकर पिकाऊ जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. काही शेतकऱयांनी योजना राबविण्यास संमती दिली आहे. तर ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो, त्यांनी न्यायालयात धाव घेऊन भू-संपादन करू नये, अशी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे 45 एकर जमिनीबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच भू-संपादनास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाची स्थगिती असतानादेखील बुडाने शेतकऱयांच्या सातबारा उताऱयावर आपले नाव दाखल केले आहे. जमिनीच्या उताऱयावर दाखल केलेल्या नावाबद्दल कणबर्गी, सिद्धेश्वरनगर येथील सिद्धाप्पा लक्ष्मण मालाई यांनी बुडाला निवेदन देऊन सातबारावरील नाव कमी करावे, भू-संपादन करू नये, अशी मागणी केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही.
भू-संपादनाची धास्ती सिद्धाप्पा लक्ष्मण मालाई यांच्या आई मल्लव्वा लक्ष्मण मालाई यांनी घेतली. सातबारा उताऱयावर नाव दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मानसिक धक्काच बसला होता. तेव्हापासून त्या आजारी झाल्या होत्या. बुडाच्या कारवाईची धास्ती घेऊन मल्लव्वा यांचा दि. 15 जुलै रोजी मृत्यू झाल्याचा आरोप सिद्धाप्पा मालाई यांनी केला आहे.
यापूर्वी भू-संपादनाची नोटीस पाठविल्यामुळे वडील लक्ष्मण महादेव मालाई यांनीदेखील धास्ती घेतली होती. तसेच दि. 22 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांचे निधन झाले होते. बुडाने केलेल्या कारवाईच्या धास्तीमुळे माझ्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार सिद्धाप्पा मालाई व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.