भोगावती येथे सकाळी शुभारंभ, पुईखडी पिरवाडीत सायंकाळी समारोप, माजी आमदारांची उडवाउडवीची उत्तरे, डिसेंबर २०२२ अखेर काम पुर्ण करून घेणार
भोगावती/प्रतिनिधी
भोगावती ते पुईखडी पिरवाडी (कोल्हापूर) पर्यंतच्या रेंगाळलेल्या नवीन रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करून संपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावी या मागणीसाठी करवीर व राधानगरी तालुका शेकापक्षाच्या वतीने शुक्रवारी पायी दिंडी, बैलगाडी व मोटार रॅली काढून आंदोलन करण्यात आले. त्याचा शुभारंभ भोगावती येथे केला असून पुईखडी येथे समारोप होईल अशी माहिती पक्षाचे करवीर तालुका चिटणीस व भोगावतीचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील यांनी भाषणात दिली.
शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील राजर्षी शाहू पुतळ्यास केरबा भाऊ पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिंडीचा शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील, करवीर तालुका चिटणीस व भोगावतीचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील, पक्षाच्या मध्यवर्ती कमिटीचे सदस्य एकनाथराव पाटील, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर यांची भाषणे झाली.
या आंदोलन दिंडीत कोथळीच्या बहुतांशी ग्रामस्थांसह माऊली भजनी मंडळ कोथळी आणि कोथळी व परिते येथील नागरिक बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते. यामध्ये भोगावतीचे माजी संचालक विश्वासराव वरुटे पाटील, दत्ता हणमा पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य सरदार पाटील, राधानगरी तालुका चिटणीस अंबाजी पाटील, रामदास पवार पाटील, युवा नेते शरद पाटील, संजय डकरे, मोहन पाटील आणाजे, श्रीपती पाटील व तुकाराम खराडे हसूर, सुधाकर चव्हाण, शिवाजी वाघुर्डेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यासंदर्भात एका दैनिकात शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या बातमी बाबत गैरसमज करुन घेऊन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी यावेळी तोंडसुख घेतले. याबाबत पत्रकारांनी तेथेच जाब विचारला असता अपूर्ण माहिती देऊन पवार पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
या रस्त्याच्या कामाला कालपासून सुरुवात झाली असून डिसेंबर २०२२ अखेर काम पुर्ण करून घेण्याच्या दृष्टीने खात्याने नियोजन केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे (भुदरगड विभाग) उप अभियंता दिपक मिरजकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.