प्रतिनिधी /मडगाव
भाजप सरकारला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी 9 वर्षे लागली. काँग्रेस सरकारने या रुग्णालयाच्या बांधकामाची सुरुवात करून जवळपास 60 टक्के काम पूर्ण केले होते. भाजपा सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले ‘अटल सेतू’ आणि ‘काणकोण बायपास’ सारखे प्रकल्प ही ‘भ्रष्टाचाराची स्मारके’ बनली आहेत. गोव्यातील पवित्र स्थळांना भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षापासून दूर ठेवूया असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले आहे.
पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुर्नबांधणीच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. स्वतःसाठी गैरमार्गाने संपत्ती गोळा करण्याच्या मागे असलेले भाजपचे नेते देवालाही सोडणार नाहीत असा घणाघाती आरोपही दिगंबर कामत यांनी केला.
गोव्यातील जनतेने भाजपची गेल्या दहा वर्षांतील अपयशी आणि भ्रष्टाचारी कामगिरी उघडय़ा डोळय़ांनी पाहिली आहे. लोकशाहीच्या मंदिरातील शिष्टाचार राखण्यात ते अपयशी ठरले आहेत. रात्रीच्या अंधारात सौदा करत, जनादेशाला धुडकावून लावत भाजपने लोकशाहीची हत्या केली, असे कामत म्हणाले.
सुशिक्षित आणि पात्र तरुणांना गुणवत्तेच्या आधारावर नोकरीच्या संधी देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या मनात त्यांच्या सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि महिलांवरील अत्याचारांना लगाम लावला पाहिजे.
जनतेमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी रुग्णालयांची निर्मिती करणे गरजेचे आहे. खड्डे नसलेल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची वेळ आली आहे. अत्यंत गरजेचे असणारे मडगाव आणि म्हापसा येथील बस स्टँड बांधण्यातही भाजप सरकार अपयशी ठरले. म्हापसा येथे रवींद्र भवनची निर्मितीही भाजपा सरकारच्या काळात होऊ शकली नाही. सांकवाळ येथील कलाभवनही गेल्या 10 वर्षांपासून बंद आहे, असा भाजपच्या अपयशाचा पाढाच कामत यांनी वाचला.
हे अपयशी भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आपला नक्की पराभव होणार आहे हे लक्षात आल्यामुळेच मूळ मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत करत आहेत असा हल्लाबोल दिगंबर कामत यांनी केला आहे.
गोव्यातील जनता भाजपच्या जुमल्यांना भीत नाही. काँग्रेस पक्षच गोव्यात पुढील सरकार स्थापन करेल, असा विश्वासही दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.