प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे प्रतिपादन : आज देणार राज्यपालाना निवेदन
प्रतिनिधी / पणजी
सध्या भ्रष्टाचारी आमदार, मंत्री गोव्याचे सरकार चालवित आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी जाहिरपणे विधान केले आहे. त्यामुळे या सरकारला क्षणभरही सत्तेवर रहाण्याचा अधिकार नाही. मात्र हे सत्तापीपासून सरकार नैतिकता बाळगून पायउतार होणार नाही. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपतीना पत्र पाठवून हे सरकार बडतर्फ करण्याची शिफारस करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. त्याबाबत मात्र सोमवारी आपण राज्यपालांना मागणीपत्र देणार असल्याचेही त्यानी सांगितले.
राज्यात आमदार, मंत्री यांच्यासह पोलीस अधिकारीही भ्रष्टाचारी असल्याचे आजगावकर यांनी उघडपणे जाहिर केले आहे. गोव्यात कोणता आमदार व पोलीस अधिकारी स्वच्छ आहे असा प्रश्नच खुद्द आजगावकरानी उपस्थित केला आहे. त्यामुळे आजगावकरांनी एकप्रकारे भ्रष्टाचाराचे प्रशस्तीपत्रच सर्व आमदार मंत्र्यांना दिले आहे. या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोळावला आहे हे सर्व संपूर्ण गोमंतकीय जाणून आहेत. मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री भ्रष्टाचारात कसे बरबटलेले आहे हे काँग्रेसने अनेकवेळा दाखवून दिले आहे. पण या सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. उलट ‘निर्लज्यम सदासुखी’ हा प्रत्यय बाबू उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांनी आपल्या वक्तव्यातून आणून दिले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनीच याची दखल घ्यायला हवी.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, कचरा व्यावस्थापनमंत्री मायकल लोबो, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर, मंत्री माविन गुदिन्हो, दीपक पाऊसकर, मिलींद नाईक, विश्वजित राणे व अन्य मंत्र्यांची भ्रष्टाचारी प्रकरणे काँग्रेसने वेळोवेळी काढलेली आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी अन्य मंत्र्याविरोधात कधीच कारवाई केली नाही. खुर्ची सांभाळण्यासाठी मंत्र्यांच्या लुटीला त्यानी मान्यता दिली. राज्यपाल हे राज्याचे घटनाप्रमुख सरकारला बडतर्फ करणेच योग्य ठरणार आहे. पर्यटन खात्याची आजगावकरानी लुट केली आहे. स्वतः पर्यटक बनून त्यानी विदेश दौरे केले. व इव्हेट मॅनेजमेंटच्या नावाखाली तिजोरीची लूट केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातही मोठा भ्रष्टाचरा आहे. किनारे स्वच्छता प्रकरणातही आजगावकर यांनी तिजोरी साफ केली.
कचरा व्यावस्थापन मंत्र्यांनी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकारणात केलेले घोटाळे उघड आहेत. अंमली पदार्थ, वेश्या व्यावसाय राजरोसपणे सुरू आहे. हप्तेखोरीला सोकावलेले हे सरकार राज्याच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. म्हादई, खाणी व्यावसाय, पर्यटन या सर्व विषयावर सरकारचे अपयश स्पष्ट झाले आहे. हे सरकार भ्रष्टाचाऱयांचे असून या सरकारच्या हाती गोव्याचे भवितव्य सुरक्षीत नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांनी करावी अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.