वार्ताहर/ संगमेश्वर
कुटुंबातील विवाह समारंभासाठी कुटुंबियांना घेवून जाणाऱया माय-लेकीचा संगमेश्वरजवळच्या आंबेडखुर्द येथे मंगला एक्सप्रेस रेल्वेमधून तोल जावून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 8.15 च्या सुमारास घडली.
ममतादेवी भजनलाल (40) आणि रमा भजनलाल (20) असे रेल्वेतून पडून मृत झालेल्या माय-लेकीचे नाव आहे. उत्तरप्रदेश भजनलाल हे मुळ गाव असलेले भजनलाल कुटुंब गेली सुमारे 6 वर्षे नोकरीनिमित्त रत्नागिरी येथे वास्तव्याला आहे. ममतादेवी भजनलाल, मुलगी रमा आणि भाऊ तेजवीर हे रत्नागिरीत राहत होते. पुढील महिन्यात रमाचा विवाह असल्याने ते उत्तरप्रदेश येथे जात होते. त्यासाठी मंगला एक्सप्रेसचे आरक्षण त्यांनी केले होते. रेल्वेला गर्दी असल्याने तेजवीरने आई आणि बहिणीला दिव्यांग डब्यामध्ये बसवले. या प्रवासात शुक्रवारी सकाळी 8.15 च्या सुमारास आंबेडखुर्द येथील बोगद्यात ममतादेवी भजनलाल (40) आणि रमा भजनलाल (20) या दोघींचा तोल जावून त्या रेल्वेतून पडल्या. यामध्ये मेंदूला मार लागल्याने दोघींचाही मृत्यू झाला. या बाबत तेजवीर भजनलाल यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस कोष्टी व सहकाऱयांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.
चिपळूणला आई-बहिणीला पाहण्यासाठी उतरला पण…
चिपळूणला रेल्वे थांबल्यानंतर आई ममतादेवी आणि बहीण रमा यांना पाहण्यासाठी गेलेल्या तेजवीरला आपली आई आणि बहीण दिसली नाही. त्यामुळे त्यांने रेल्वेस्थानकात चौकशी केली. त्याचदरम्यान संगमेश्वर पोलिसांनी त्याला फोन करून बोगद्यात घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर तो संगमेश्वरला आला.