इंधन संपुष्टात आल्याची सूत्रांची माहिती
@ वृत्तसंस्था / बेंगळूर
प्रक्षेपणाला जवळपास एक दशक उलटल्यावर भारताच्या पहिल्या मंगळमोहिमेचा म्हणजेच मंगळयानाचा प्रवास संपुष्टात आला आहे. द मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम)चे इंधन (प्रोपेलंट) संपुष्टात आल्याने लाल ग्रहावरील कक्षेत भ्रमण करणे या यानाला अवघड ठरल्याचे समजते. इस्रोने हे मंगळयान पुन्हा सक्रीय होऊ शकणार की नाही यासंबंधी कुठलीच माहिती सध्या दिलेली नाही.
मंगळयानात इंधन शिल्लक नसल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे. मंगळयानाची सॅटेलाईट बॅटरी देखील काम करत नसल्याचे सांगण्यात आले. मागील काही काळात वारंवार झालेल्या ग्रहणांमुळे आणि यातील एक ग्रह साडेसात तासांहून अधिक काळ राहिल्याने ही स्थिती ओढवली आहे. सॅटेलाईट बॅटरी ही एक तास 40 मिनिटांपर्यंतचे ग्रहणच हाताळू शकत होती. याहून अधिक काळ चाललेले ग्रहण हाताळणे बॅटरी संपुष्टात आल्याची माहिती इस्रोमधील सूत्रांकडून देण्यात आली.
मंगळ मोहिमेने यापूर्वीच अपेक्षांहून अधिक काळ कार्यरत राहण्याची कामगिरी केली आहे. मंगळयान हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत 6 महिन्यांपुरती प्रदक्षिणा घालू शकेल यानुसारच डिझाईन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात या यानाने 8 वर्षे मंगळग्रहाच्या कक्षेत कायम राहत भारताच्या मोहिमेला यशस्वी ठरविले आहे.
मंगळयान 2013 साली पीएसएलव्ही-सी25द्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते. भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचण्यास यशस्वी ठरला होता. तर पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वी प्रक्षेपण करू शकणाऱया देशांच्या गटात भारत सामील झाला होता. मंगळाच्या पृष्ठभागावरील वैशिष्टय़े, मॉर्फोलॉजी, मिनरलॉजीचा अभ्यास करणाऱया 5 उपकरणांचा मंगळयानात अंतर्भाव करण्यात आला होता. भारत आगामी काही वर्षांमध्ये पुन्हा मंगळमोहीम साकारणार आहे.