सातत्याने तक्रार करूनही अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
पावसामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मात्र एल ऍण्ड टी आणि स्मार्ट सिटी कंपनी अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे मंगळवार पेठेतील पाणीपुरवठा महिन्याभरापासून बंद आहे. याबाबत तक्रार केली असता एकमेकाकडे बोट करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी टिळकवाडी देशमुख रोड आणि मंगळवारपेठ परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदीचे पाणी हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये शिरले. येथील विद्युतपंप खराब होण्याचा धोका निर्माण झाल्याने पंप सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत. शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद असल्यामुळे शहरवासियांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पण मंगळवारपेठ, देशमुख रोड परिसरासह विविध भागातील पाणीपुरवठा मागील 27 दिवसांपासून बंद आहे.
या ठिकाणी देशमुख रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच विद्युतवाहिन्या, डेनेजवाहिन्या व गटारीकरिता पाईप घालण्याचे काम करण्यात येत आहे. याकरिता ठिकठिकाणी खोदाई केल्याने जलवाहिन्यांचे नुकसान झाले होते. पण बहुतांश जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र मंगळवारपेठेतील पाणीपुरवठा अद्यापही पूर्ववत झाला नाही.
या समस्येबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता, सदर काम स्मार्ट सिटीकडून करण्यात येत असल्याने स्मार्ट सिटी कार्यालयात तक्रार करण्याची सूचना केली. पण स्मार्ट सिटी कंपनीकडे सातत्याने तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केली असता एल ऍण्ड टी कंपनीचा क्रमांक देऊन त्याठिकाणी तक्रार करण्याची सूचना अधिकाऱयांनी केली. यामुळे एल ऍण्ड टी कंपनीकडे तक्रार करून आठ दिवस झाले तरी दुरुस्ती केली नाही. तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत केला नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.