समस्येकडे दुर्लक्ष : जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याचे कारण पुढे
प्रतिनिधी /बेळगाव
देशमुख रोड, टिळकवाडी परिसरात विकासकामे राबविण्यात येत असल्याने जलवाहिनीचे नुकसान झाले आहे. परिणामी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे देशमुख रोड परिसरात काही घरांचा पाणीपुरवठा तब्बल 18 दिवसांपासून ठप्प झाला आहे.
देशमुख रोड परिसरातील रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. याकरिता विविध ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेज वाहिन्या व विद्युत वाहिन्या तसेच जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. पथदीप बसविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदाई करण्यात आली आहे. परिणामी ठिकठिकाणी जलवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे. मंगळवारपेठेतील काही घरांना पाणीपुरवठा बंद झाला आहे. मागील अठरा दिवसांपासून नळाला पाणी आले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा बंद असल्याची तक्रार मंडळाच्या कार्यालयात देण्यात आली असता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम सुरू असल्याने जलवाहिनीचे नुकसान झाले आहे. दुरुस्ती करून पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. पण दुरुस्तीनंतरही पाणीपुरवठा झाला नसल्याने पुन्हा संपर्क साधला असता, डेनेज वाहिन्या व विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने जलवाहिनीचे नुकसान झाले असल्याचे कारण देण्यात आले.