प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे सोमवारी 7 म्हशी दगावल्या होत्या. हे सत्र दुसऱया दिवशीही सुरू होते. मंगळवारी आणखी 2 म्हशी व 1 रेडा दगावला. ही जनावरे कशाने दगावली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या आपत्तीमुळे पशुपालकाला मात्र लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
पिराजी चौधरी (गवळी) हे पशुपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या गोठय़ातील 7 म्हशी सोमवारी अचानक दगावल्या. पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱयांनी गोठय़ाला भेट देऊन मृत जनावरांचे पोस्टमार्टेम केले. त्याचा अहवाल येण्याआधीच मंगळवारी पुन्हा 3 जनावरे दगावली. यामुळे परिसरातील गवळी समाज बांधवांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
पशुसंगोपन खात्याचे दुर्लक्ष
त्या जनावरांना नेमका कोणता आजार झाला आहे, याबाबत माहिती अद्यापही स्पष्ट करण्यात आलेली नाही. अजूनही 3 जनावरे आजारी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पशुसंगोपन खात्याच्यावतीने केवळ सलाईन व इंजेक्शन देण्यात येत आहे. अधिकारीवर्गाच्या दिरंगाईमुळे पशुपालन करणाऱया एका व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी दगावलेल्या 3 जनावरांमुळे चौधरी यांना 3 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
मदतीचे आवाहन चांगल्या जातीच्या दुभत्या 9 म्हशी व 1 रेडा दगावल्याने पिराजी चौधरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. दूध विक्री करून व्यवसाय करणाऱया या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे चौधरी कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.