44 जण कोरोनामुक्त, सध्या 520 सक्रिय रुग्ण, एकाचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हय़ाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून आणि गोव्यातून येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा केला आहे. त्यामुळे अजून तरी बेळगावच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी 36 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 44 जण कोरोनामुक्त झाले आहेत.केरळमध्ये रुग्णसंख्या वाढल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्हा प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
बेळगाव जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 78 हजार 356 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामधील 76 हजार 970 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या जिल्हय़ामध्ये 520 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
मंगळवारी कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 866 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाबाबत साऱयांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे वारंवार करण्यात येत आहे. मात्र, जनतेमध्ये अजूनही म्हणावे तसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. मास्कदेखील काही जण घालत नाहीत. त्यामुळे बेळगावमध्येही रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.