प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मंगळवारी मात्र दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर भात व इतर पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या सर्वच पिकांची उगवण बऱयापैकी झाली आहे. शेतकऱयांनी कोळपणी करून तसेच भांगलण करून काम आटोपते घेतले आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. शेतकऱयांमध्ये भीती निर्माण झाली होती. मंगळवारी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
मंगळवारी सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते. त्यानंतर दुपारी अधूनमधून दमदार सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे बैठे व्यापारी आणि फेरीवाले बिनधास्तपणे व्यवसाय करत होते. मात्र मंगळवारी अचानकपणे दमदार सरी कोसळल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दुचाकी स्वार, पादचारी यांनी छत्री व रेनकोट न घेताच बाहेर पडले होते. त्यांनाही या पावसाचा चांगलाच फटका बसला. मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. बळीराजाही सुखावला आहे. सध्या तरी पावसाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे बळीराजा आशावादी आहे. अशाच प्रकारे यापुढेही पावसाने साथ दिली तर पिकांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावल्यामुळे विठूराया पावलाच अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.