राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले : दिवसभरात 6,259 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. मंगळवारी 6,259 नव्या रुग्णांची भर पडली. मागील आठवडय़ापासून राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी उच्चांकी 6,777 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील 24 तासांमध्ये 110 रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 2,704 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 1,45,830 बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 69,272 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचारातील रुग्णसंख्या 73,746 इतकी आहे. त्यापैकी 634 जण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.
बेंगळूर जिल्हय़ातील रुग्णसंख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सुधारले आहे. मंगळवारी दिवसभरात या जिल्हय़ात सर्वाधिक 4,274 जण संसर्गमुक्त होऊन घरी परतले. तर बळ्ळारी जिल्हय़ात 438, रामनगर 259, धारवाड 293, म्हैसूर 164, उडुपी 161, गुलबर्गा 152, रायचूर 116 तसेच इतर जिल्हय़ातून एकूण 6,777 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात रुग्ण डिस्चार्ज होण्याचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे.