अमरसिंह पाटील / कोल्हापूर
मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी-मिरजकर तिकटी मार्गावरील बहुतांशी इमारतींच्या तळघरांमध्ये (बेसमेंट) पाणी साचण्याचे प्रकार वाढत आहेत. हे पाणी नेमके येते कुठून याबद्दल संभ्रम आहे. बारमाही पाणी साचत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱया पाईपलाईनला लागलेल्या गळतीच्या पाण्याने तळघर भरत असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक दिवस या तळघरांमध्ये पाणी साचल्याने परिसरात डेंग्यूसदृश्य तापाचे रूग्ण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. दरम्यान, या पाण्याच्या घुसखोरीकडे महापालिका पाणी पुरवठा विभाग आणि प्रशासन यांच्याकडे स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून गंभीर दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने पाईपलाईन गळतीची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.
दोन-तीन वर्षांपासून कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटी परिसरातील घरे, इमारतीत तळघरात शुद्ध पाणी साचून राहत आहे. परिसरात आड, विहिरींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भुगर्भातील हे पाणी झिरपून तळघरात येत असेल, असा नागरिकांचा समज होता. मात्र शहरासह जिल्हय़ात ऑगस्टमध्ये उद्भावलेल्या महापुराच्या काळात शहराचा पाणीपुरवठा दोन आठवडे बंद होता. निम्मे शहर पाण्याखाली असताना मात्र या परिसरात तळघरांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे एwन पावसाळय़ात तळघरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी कसे, याची चर्चा सुरु होती.
दरम्यान, नागरिकांनी तळघरामध्ये येणारे पाणी हे आड, विहिरीतून येत नसल्याचा अंदाज व्यक्त केला, तसेच पाणीपुरवठा करणाऱया पाईपलाईनला मोठय़ा गळतीची शक्यताही वर्तवली जात आहे. पाईपलाईनला गळती असेल तर महापालिकेचे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
व्यापाऱयांचे नुकसान
कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटी हा मार्ग शहरातील एक प्रमुख मार्ग आहे. याच्या दुतर्फा विविध दुकाने आहेत. यापैकी बहुतांश व्यापाऱयांच्या तळघरात पाणी साचत आहे. तळघराचा वापर करणे व्यापाऱयांसाठी मुश्कील बनले आहे. त्यामुळे महापालिकेने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
– धर्मराज जगताप, हॉटेल व्यावसायिक
आरोग्याचा प्रश्न गंभीर
तळघरात पाणी साचत असल्याने दुकाने, घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. बरेच दिवस पाणी साचत असल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
– सुहास भोला, व्यापारी.