वार्ताहर / मंगसुळी :
मंगसुळी परिसराला वरदान ठरलेल्या ऐनापूर पाणीपुरवठा योजनेच्या कालव्यातून नुकतेच कृष्णेचे पाणी सोडल्याने शेतकरी वर्गासह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ऐनापूर पाणीपुरवठा कालव्यातून गेली अनेक वर्षे फक्त पावसाळय़ात जून ते सप्टेंबरअखेर पाणी सोडले जात होते.
पावसाळा बंद होताच कालवा बंद करण्यात येत होता. याचा फायदा फक्त खरीप हंगामातील पिकांना होत होता. इतर काळात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई भासत होती. शिवाय ऊस लागणीसाठी अडथळा येत होता. इतर पिकांनाही पाणी टंचाई भासत होती. यंदा उसाची वेळेत उचल झाल्याने पुन्हा ऊस लागवडीकडे शेतकऱयांचा कल दिसून येत आहे. सखल भाग वगळता माळमुरडय़ा जमिनीतील विहिरी व कूपनलिकेची पाणीपातळी खालावल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, शाळू पिकांना याचा फटका बसत होता. यामुळे शेतकरी चिंतेत होते.
या भागातील शेतकऱयांचे हित जोपासण्यासाठी व कागवाड मतदारसंघात हरितक्रांती बनवण्यासाठी या भागाचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून ऐनापूर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने शेतकरीवर्ग तसेच नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
अतिवृष्टी, अवकाळीचाही फायदा
गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी तसेच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी प्रवाहित राहिले. इतरवर्षी नोव्हेंबरपर्यंतच प्रवाहित राहणाऱया नदी पात्रात या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पाण्याची उपलब्धता राहिल्याने कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडणेदेखील सोपे झाले. त्यामुळे कालव्याशेजारी विहिरींना पाणी येण्यास व बोअरवेल चार्ज होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.